राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

सोमवार, १३ जानेवारी, २०२५

 


डॉ. मोहनराव मधुकरराव भागवत 






वर्तमानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेतृत्व करणारे सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत व संघाचे राजकीय अपत्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघेही समवयस्क. दोघांचाही जन्म १९५० सालातला. दोघेही प्रखर हिंदुत्वाचा वसा घेतलेले पण तेवढेच आधुनिक विचारांचे सुधारणावादी नेते. यामुळेच की काय, दोघांच्याही आचारात, विचारात कमालीचे साम्य पाहायला मिळते. या दोघांचे सूर जुळल्यामुळेच, मोहनराव भागवतांनी संघाचे नेतृत्व करायला सुरुवात केल्यापासून भाजपाने कात टाकली व २०१४ साली नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे पूर्ण बहुमतातील सरकार स्थापन झाले.

 

याआधी देखील अटल बिहारी वाजपेयी हे ३ वेळा पंतप्रधान झाले होते पण त्यातील दोन वेळा ते सरकार अल्पायुषी ठरले. अपवाद १९९९ च्या वाजपेयी सरकारचा, जे संपूर्ण कार्यकाळ चालले. परंतु ते सरकारही युतीचे असल्यामुळे किमान समान कार्यक्रमाच्या पलीकडे इतिहासावर छाप उमटेल व संघाला अपेक्षित असे निर्णय घेवू शकले नाही. युती वा आघाडीच्या सरकारची ती अपरिहार्यता होती. परंतु २०१४ ते २०२४ पर्यंत पूर्ण बहुमतातील व त्यानंतर २०२४ ला आलेले युतीचे पण स्थिर सरकार लाभल्याने मोहन भागवतांच्या काळात संघाला अपेक्षित असे अनेक कायदे मंजूर तर झालेच पण अनेक रखडलेली प्रकरणे कायम स्वरुपी निकाली निघाली. या दृष्टीने सद्य सरसंघचालकांचा पायगुण चांगला आहे असेच म्हणावे लागेल.


सद्य सरसंघचालक डॉ मोहनराव भागवत यांचा जन्म ११ सप्टेंबर १९५० रोजी चंद्रपूर येथे झाला. भागवत कुटुंबात आई-वडिलांसहित ३ मुलगे व १ मुलगी असे मिळून ६ जण. भावंडांमध्ये मोहनराव सर्वात मोठे. मोहनराव खूपच सुदैवी आहेत असे म्हणावे लागेल कारण मोहनरावांचे आजोबा नारायणराव भागवत हे संघस्वयंसेवक होते. त्यांचे वडील मधुकरराव भागवत हे देखील त्यांचे लग्न होण्यापूर्वी काही काळ संघाचे गुजरातमधे प्रांत-प्रचारक होते व आई मालतीबाई या राष्ट्र सेविका समितीच्या स्वयंसेविका होत्या. त्यामुळे मोहनरावांना संघाचे बाळकडू बालपणी नव्हे तर गर्भातच मिळाले होते असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही.


मोहनरावांचे शालेय शिक्षण चंद्रपूर येथे झाले तर पशू वैद्यकीय चिकित्सेच्या शिक्षणासाठी त्यांना नागपूर येथे जावे लागले. पशु वैद्यकीय चिकित्सक म्हणून पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी काही काळ सरकारी नोकरी केली पण कालांतराने १९७५ साली त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन वयाच्या २५ व्या वर्षी पूर्णवेळ प्रचारक म्हणून संघकार्याला वाहून घेतले ते आजपर्यंत.

 

पूर्णवेळ प्रचारक म्हणून मोहनरावांनी काम करायला सुरवात करताच काही दिवसातच इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली. अनेक संघस्वयंसेवकांची धरपकड झाली. मोहनरावांच्या आई-वडिलांना तुरुंगात जावे लागले. त्यावेळी अटक टाळण्यासाठी संघनेत्यांच्या आदेशावरून तरुण मोहनराव भूमिगत झाले व आणीबाणी संपेपर्यंत अनेक ठिकाणी गुप्तपणे राहून त्यांनी संघकार्य सुरूच ठेवले. या १९ महिन्यांच्या भूमिगत कालावधीत त्यांनी अनेक संघस्वयंसेवकांच्या कुटुंबांना मदत केली व आधार दिला.


मोहनरावांनी शारीरिक शिक्षण प्रमुख, प्रचार प्रमुख, सरकार्यवाह आदी अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यानंतर २१ मार्च २००९ ला सुदर्शनजी यांच्याकडून त्यांनी सरसंघचालक पदाची सूत्रे हाती घेतली.


भारताला लाभलेली प्राचीन व उच्च परंपरा, संस्कृती व सामाजिक मूल्ये यांच्या पक्क्या पायावर आधारीत, आधुनिक तंत्रज्ञान व युगाला सामावून घेणाऱ्या समाजव्यवस्थेचे ते खंदे पुरस्कर्ते आहेत. त्यांच्या साध्या, सरळ स्वभावामुळे ते सर्वांनाच, अगदी विरोधकांनाही आपलेसे वाटतात. समोरच्याला समजेल अश्या साध्या-सोप्या-सरळ भाषेत आणि आपल्या तशाच स्वभावाला अनुरूप असे विचार मांडणे ही त्यांची खासियत आहे. ते एक उत्कृष्ट वक्ते, द्रष्टे नेते व कुशल संघटक आहेत. आपल्या सहकाऱ्यांना अगदी सहज वाटेल अशा पद्धतीने ते त्यांच्याशी संवाद साधतात.


मोहनराव भविष्यातील वेध घेवून व्यक्त होतात. कित्येक वेळा आगावू माध्यमे त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावतात व निष्कारण वाद निर्माण करतात. परंतु बारकाईने पहिले असता हे लक्षात येते की त्यांचे विचार हे शास्त्रीय दृष्ट्या योग्य, सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचे व व्यावहारिक दृष्ट्या स्वीकारार्ह्य असतात. कित्येक वेळा तर एका दूरदर्शी नेत्याला साजेसे काळाच्या पुढे असतात.


हिंदू धर्मातील जातीव्यवस्थेवर ते कडाडून हल्ला करतात. या संबंधात बाळासाहेब देवरसांनी “जातीभेद संपविल्याशिवाय हिंदू एकता कठीण आहे, अस्पृशता हा मानवतेला लागलेला कलंक आहे” असे म्हणून व्यक्त केलेले विचारच ते पुढे घेवून जातात.
एवढेच नव्हे तर  जोपर्यंत हिंदू धर्मात सामाजिक असमानता आहे तोपर्यंत आरक्षण राहिलेच पाहिजे असे म्हणत आरक्षणाच्या विरोधात असलेल्या लोकांना ते सामाजिक समरसतेचे व असमानता संपुष्टात आणण्याचे आवाहन करतात. आरक्षणावर त्यांनी केलेले विधान माध्यमांनी मोडतोड करून व चुकीच्या पद्धतीने दाखवले. परंतु स्वतः मागासवर्गिय समाजातील असूनही व घटनेद्वारे मागासवर्गिय व आदिवासी समाजाला आरक्षण देणाऱ्या घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नेमके हेच म्हटले होते हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवे.


वंश टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक जोडप्याने किमान ३ अपत्यांना जन्म दिला पाहिजे हे त्यांचे विधान याआधी अनेक मानववंशशास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे व त्याला ऐतिहासिक पुरावा आहे. याचा अभ्यास न करता उथळ विरोधकांनी त्याच्यावर टीका करणे जसे विरोधकांच्या अज्ञानाचे प्रतीक आहे तसेच ते त्यांच्या कोत्या मनोवृत्तीचे लक्षण आहे.


मोहनराव अखंड हिंदुस्थानचे पुरस्कर्ते आहेत. फाळणीचे दुःख तेव्हाच दूर होईल जेव्हा अखंड हिंदुस्थान निर्माण होईल तसेच हिंदू धर्म हाच खरा धर्म आहे आणि इतर धर्म हे त्यातून उत्पन्न झालेले पंथ (उपासना पद्धती) आहेतहे ते कोणतेही आढेवेढे न घेता सांगतात तेव्हा त्यांच्या विचारांची खोली स्पष्ट होते.


परंपरेला व मान्यतेला धक्का देणारे मोहनराव तृतीय पंथीयांच्या बाबतीत संवेदनशील आहेत. तृतीयपंथी लोक या समाजाचा एक हिस्सा असून इतर नागरिकांप्रमाणेच त्यांना सन्मानाने वागवले गेले पाहिजे आवाहन त्यांनी केले आहे. “तृतीयपंथी असणे यात अनैसर्गिक असे काही नाही. जोपर्यंत मानव जात आहे तोपर्यंत जैविक दृष्टिकोनातून तृतीयपंथी सुद्धा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे हे शाश्वत सत्य ते जगापुढे मांडतात.

 

मोहनराव चांगले गायक आहेत. संघगीतांना चाली लावून ती गाणे हा त्यांचा छंद आहे. संगीताची आवड असलेल्या मोहनरावांना त्यात उत्तम गती आहे. ते स्वतः सुंदर बासरी वाजवतात. त्यांच्या या संगीत प्रेमामुळे ते घोषावर विशेष लक्ष देतात. घोषाला लागणाऱ्या विविध वाद्यांच्या निर्मितीत तसेच त्यांच्यात सुधारणा करण्याच्या बाबतीत त्यांचे अधिक लक्ष असते.

 

मोहनरावांना प्रवासाची आवड आहे. सरसंघचालक या नात्याने त्यांना दरवर्षी प्रत्येक प्रांतात किमान एकवेळा तरी प्रवास करावा लागतो. संघाच्या वाढत्या प्रभावामुळे आज जगभर संघाबद्दल उत्सुकता व आकर्षण आहे. त्या दृष्टीने मोहनरावांना जगभर प्रवास करावा लागतो. या प्रवासा दरम्यान हिंदू संस्कृती, सभ्यता, सांस्कृतिक परंपरा व इतिहास यांचा प्रचार-प्रसार करता येतो व हिंदुस्थानच्या महानतेची ओळख परदेशी नागरिकांना करून देण्याची संधी देखील प्राप्त होते.


हिंदू समाजाचे नेतृत्व करणारे उदार मनाचे व आधुनिक विचारांचे मोहनराव हे नव्या युगातील
आधुनिक ऋषी आहेत. त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवणे हे हिंदूहिताचे आहे. जोपर्यंत संघ आहे, मोहनरावांसारख संघ नेतृत्व आहे, तोपर्यंत हिंदू सुरक्षित आहे. त्यांच्या व त्यांच्यासारख्या संघनेत्यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान विश्वगुरु बनेल, हिंदुस्थान नुसती महाशक्ती नाही तर साऱ्या जगाची आध्यात्मिक राजधानी बनेल असा ठाम विश्वास आहे.

 


५ टिप्पण्या:

  1. प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद. संघावर एकूण ५३ लेख लिहिणे अपेक्षीत आहेत. १५ प्रसिद्ध केले. यापुढे आठवड्याला २ असे प्रसिद्ध करेन

      हटवा
  2. अशी माहिती देणे आवश्यक होते. उत्तम.

    उत्तर द्याहटवा