राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

सोमवार, १३ जानेवारी, २०२५

 


मधुकर दत्तात्रेय उपाख्य बाळासाहेब देवरस


 


बाळासाहेबांचा जन्म ११ डिसेंबर १९१५ रोजी नागपूर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील महसूल खात्यात नोकरीला होते. नागपूरच्या इतवारीत देवरस कुटुंबाचे निवास स्थान आणि गोंदियाजवळ कारंजा गावात वडिलोपार्जित शेती होती. बीए. एलएलबी पर्यंत त्यांचे शिक्षण झाले होते. लहानपणापासूनच संघस्वयंसेवक म्हणून संघात प्रवेश केलेल्या बाळासाहेबांना डॉक्टरांच्या व गुरुजींच्या प्रत्यक्ष सहवासाचा लाभ झाला. त्यांच्यावर डॉक्टरांचे व गुरुजींचे संस्कार झाले. त्यामुळे त्यांच्यात एक आदर्श संघानुकूल स्वयंसेवक घडत गेला.

 

गुरुजींच्या प्रेरणेने १९५० साली त्यांनी ‘श्रीनरकेसरी प्रकाशन ट्रस्ट’ स्थापन करून मराठी दैनिक ‘तरुण भारत’ चालविण्याची जबाबदारी घेतली. ते स्वतः या ट्रस्टचे अध्यक्ष होते. त्यानंतरच देशात संघविचार म्हणजेच राष्ट्रविचार जनमानसात पोहचविण्याच्या उद्देश्याने विविध दैनिके, साप्ताहिके प्रकाशित होण्यास सुरुवात झाली. संघशाखा अधिक समाजोन्भिमुख करण्याकडे त्यांचे लक्ष असे. प्रत्येक शाखेने एक तरी वस्ती दत्तक घ्यावी  तेथे समाजोपयोगी कार्य करावे असे ते सांगत. याचा उपयोग असा झाला की शाखेशेजारील वाडीवस्त्यात सुरू असलेल्या समाजोपयोगी कामांचा दृश्य परिणाम लोकांना जाणवू लागला व शाखेत येणाऱ्या स्वयंसेवकांची संख्या झपाट्याने वाढू लागली.



गुरुजींची जीवनयात्रा १९७ च्या जून महिन्यात संपली. आपल्यानंतर मधुकर दत्तात्रेय उपाख्य बाळासाहेब देवरस यांनी सरसंघचालक म्हणून काम पाहावे, अशी
ईच्छा व्यक्त करून ते अनंताच्या यात्रेला निघून गेले.

 

सर्वांनाच माहीत आहे की संघाच्या ९९ वर्षाच्या ईतिहासात ३ मोठी संकटे आली. १९४८ च्या गांधीहत्येशी संघाचा जाणूनबुजून संबंध जोडला गेला बंदी आणण्यात आली. तो गुरुजींच्या नेतृत्वाच्या कसोटीचा काळ होता. गुरुजी व संघ त्यातून सोन्याहून लख्ख उजळून निघाले. तसाच दुसरा काळ हा १९७५ ते १९७७ च्या काळ्याकुट्ट आणीबाणीचा होता. सरसंघचालक ते देशभरातील सामान्य स्वयंसेवक हे सारेच जेव्हा इंदिरा गांधींच्या इशाऱ्याने तुरुंगात डांबले गेले होते तेव्हा संघाचे धीरोदत्त नेतृत्त्व करुन, आणीबाणी विरुद्ध निकराचा लढा देवून, इंदिरा गांधींना पराभूत करुन भारताला पुन्हा एकदा लोकशाही बहाल करण्याचे ऐतिहासिक काम बाळासाहेब देवरसांनी केले.


आणीबाणीच्या काळात तुरुंगवासात असताना बाळासाहेबांचे विरुद्ध विचारसरणीच्या अनेक नेत्यांशी संबंध आले. वैचारीक देवाणघेवाण झाली. या विचारमंथनातून बाळासाहेबांनी अनेक नवे मित्र जोडले. संघाबद्दलचे गैरसमज दूर करण्यात ते यशस्वी ठरले. त्यामुळेच नंतरच्या काळात भाजपाला जॉर्ज फर्नांडिस सारखा एक कट्टर डावा मित्र मिळाला. याच  काळात त्यांची अनेक मुस्लीम नेत्यांशी संघाबद्दल चर्चा होत असे. पुढे बंदी उठविण्यात आल्यानंतर संघ आणि मुस्लीम नेत्यांमध्ये संवाद सुरू झाला. या संवादातून मुस्लीम समाजातील संघाबद्दलचे गैरसमज दूर करण्यास मदत झाली. संघात मुस्लीम युवक सहभागी होऊ लागले. माजी न्यायमूर्ती महम्मद करीम छागलासारखे मुसलमान “मी वंशाने हिंदू व धर्माने मुस्लीम आहेअसे उघडपणे बोलू लागले. बाळासाहेबांच्या नागरी सत्कार कार्यक्रमात तर त्यांनी अध्यक्षस्थान ही भुषविले होते.


बाळासाहेबांच्या काळात,
विशेषतः आणीबाणीनंतर संघ दश-दिशांनी वाढला. वस्ती-वस्तीत संघाच्या शाखा लागू लागल्या. कंठा-कंठात नमस्ते सदा वत्सले मातृभूमे ही प्रार्थना घुमू लागली. संघाच्या जवळ-जवळ सर्वच भातृसंस्थांनी का टाकत नवी भरारी घेतली. २१ व्या शतकाला सामोरे जाताना संघ आचाराने व विचाराने अद्ययावत असावा ज्याजेणे संघ आधुनिक काळातील आव्हाने स्वीकारू शकेल असे त्यांचे मत होते व त्या दृष्टीने ते सतत प्रयत्नशील होते. हिंदू, हिंदुत्व आणि हिंदुराष्ट्र या संघाने स्वीकारलेल्या सिद्धान्तांची बदलत्या परिस्थितीच्या संदर्भात योग्य व्याख्या करीत बाळासाहेबांनी देशातील सर्व धर्म-पंथातील बुद्धिजीवी आणि विचारवंतांना प्रभावित केले. संघाशी संबंधीत नसलेले पण आपापल्या क्षेत्रात नावाजलेले असंख्य लोक संघाशी जोडले गेले. अभाविप, विहीप सारख्या अनेक संस्थांना नवे नेते मिळाले, ज्यांनी पुढे जावून इतिहास लिहिला. त्यांच्याच काळात संघात कालानुरूप बदल घडत गेले. राजकीय क्षेत्रात संघ अधिक योगदान देत गेला.  

 

बाळासाहेबांच्या कार्यकाळात त्यांनी २ वेळा संघबंदीचा यशस्वी सामना केला व दोन्ही वेळा संघ पहिल्यापेक्षा अधिक मजबूत झाला. असे म्हणतात की काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान पीव्ही नरसिंहराव यांचा बाबरी मशिदीचा विवादित ढांचा पाडण्यास अप्रत्यक्षरित्या पाठिंबा होता. त्यामुळे त्यांच्या काळात संघावर १० डिसेंबर १९९२ रोजी घातलेली बंदी ही केवळ राजकीय अपरिहार्यतेमुळे घालण्यात आली होती. अल्पमतातील सरकार चालवताना आघाडीतील मुलायम सिंह व लालू प्रसाद यादव यांच्या दबावाखाली किंवा दुसऱ्या भाषेत त्यांचा राग काही प्रमाणात शांत करण्यासाठी नरसिंहरावांनी हा निर्णय घेतला असावा. परंतु या तिसऱ्या संघबंदीची आधीच्या दोन बंदींप्रमाणे कठोर अंमलबजावणी करण्यात आली नव्हती व केवळ ६ महिन्यातच ४ जून १९९३ रोजी ती विनाअट उठवण्यात आली. त्यामुळेच की काय, बहुतेक जणांना संघावरील पहिल्या २ संघबंदीच फक्त लक्षात आहेत व त्यामानाने अगदी अलीकडच्या काळात घातली गेलेली तिसरी संघबंदी विशेष चर्चेत राहिली नाही.


 
सुमारे २१ वर्षे बाळासाहेब सरसंघचालक होते. हा काळ संघाच्या आणि देशाच्या इतिहासातील सर्वात कठीण, आव्हानात्मक आणि भविष्याला दिशा देणारा काळ होता. या काळात बाळासाहेबांच्या नेतृत्वाचा खरा कस लागला. अचूक निर्णयक्षमता, योग्य मार्गदर्शन, नवीन विचार आणि प्रयोग तसेच समाजाच्या सर्व क्षेत्रांत संघविचार समर्थपणे पोहोचविण्यासाठी संघविस्तार ही बाळासाहेबांची वैशिष्ट्ये मानावी लागतील. संघाला सामाजिक आशय देत समरसतेला अधिक अर्थपूर्ण आणि सुदृढ करण्याचे काम बाळासाहेब देवरस यांनी केले. हिंदू समाजाचे संघटन करण्यात जात आडवी येते हे त्यांनी अचूक ओळखले होते. जातीभेद संपविल्याशिवाय हिंदू एकता कठीण आहे, अस्पृशता हा मानवतेला लागलेला कलंक आहे अशी त्यांची ठाम धारणा होती. अस्पृश्यतेविरुद्ध त्यांनी एल्गार पुकारला. बाळासाहेब म्हणाले, “जर अस्पृश्यता वाईट नसेल तर जगात काहीच वाईट नाही.” त्याच्याही पुढे जाऊन बाळासाहेब म्हणाले, “अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे आणि समूळ नष्ट झाली पाहिजे”.
त्या दृष्टीने समाजाच्या सर्व स्तरांत, विशेषतः शोषित, पीडित, दलित, ग्रामीण, वनवासी घटकांमध्ये समाजोपयोगी कार्याच्या माध्यमातून संघविचार पोहोचविण्यासाठी विद्या भारती, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद इत्यादी संघटनांचा अखिल भारतीय स्तरावर विस्तार करून संघकार्याला बाळासाहेब देवरस यांनीच सामाजिक आशय दिला.

 

या देशातील मुस्लीम व ख्रिश्चन हे बाहेरून आले नाहीत, ते इथलेच आहेत. काही पिढ्यांपूर्वी त्यांनी उपासना पद्धती बदलली असेल, पण त्यामुळे त्यांचे पूर्वज, संस्कृती आणि मातृभूमी बदलत नाही’ हे विचार बाळासाहेब सार्वजनिकरित्या मांडत असत. भारतीय मुस्लिमांना जर हे सत्य समजले, तर भारत विश्वगुरु बनू शकतो असे बाळासाहेबांचे मत होते. या दूरदृष्टीने त्यांनी मुस्लिमांशी संवाद साधत त्यांना देशाच्या राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

 

नागपूरला विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसंसदेत जमलेल्या शंकराचार्य, महामंडलेश्वर, संत आणि साधू-महात्मे अशा धर्माचार्यांनी ‘यति सम्राट’ पदवीने बाळासाहेब देवरस यांचा गौरव केला. १९९६ साली १३ दिवसांचे का होईना, पण संघस्वयंसेवक अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले, त्यावेळी बाळासाहेब शारिरीक दृष्ट्या ठीक नव्हते  पण अटलजींच्या शपथग्रहण समारंभाचे दृश्य दूरचित्रवाणीवर पाहताना त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच समाधानाचे तेज पसरले असेल. बाळासाहेब देवरस नावाच्या एका सामाजिक योद्ध्याच्या जीवनातील तो एक सर्वोच्च आनंदाचा क्षण होता. त्यानंतर काहीच दिवसांनी १७ जून १९९६ ला ते नश्वर देहाचा त्याग करून अनंतात विलीन झाले.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा