राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

सोमवार, १३ जानेवारी, २०२५

 


माधव सदाशिव उपाख्य


गोळवलकर गुरुजी

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितिय सरसंघचालक माधव सदाशिव उपाख्य गोळवलकर गुरुजींकडे संघ विचार परिवारात स्वामी विवेकानंदांचे सर्वात मोठे आध्यात्मिक वारसदार म्हणून पाहिले जाते. बंच ऑफ थॉट्स या गुरुजींच्या लेखन आणि भाषणांचे विवादीत पुस्तक संघाची भगद्गीता म्हणून ओळखले जाते. गुरुजींनी संघ विचारांचा विस्तार केला व त्याला राष्ट्रीय अधिष्ठान प्राप्त करून दिले. डॉ हेडगेवारांच्या विचारांना व भूमिकेला लिखित व संघटित रूप देण्याचे कार्य गुरुजींनी केले. म्हणूनच संघाचे एक प्रमुख विचारवंत मा. गो. वैद्य यांनी गुरुजींना विसाव्या शतकातील हिंदू समाजाला मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणून गौरविले आहे.

 

माघ वद्य एकादशी शके १८२७ ला (१ फेब्रुवारी १९०६) नागपूर जवळील रामटेक येथे गुरुजींचा जन्म झाला. गोळवलकर घराणे मूळचे रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यातील गोळवली गावचे. गुरुजींचे वडिल सदाशिवराव तर आई लक्ष्मीबाई. या दांपत्याला ९ अपत्ये झाली परंतु दुर्दैवाने गुरुजींची सारी भावंडे दगावली गुरुजीच केवळ वाचले.


गुरुजींनी इंटरसायन्सची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर काशी येथील हिंदु विश्वविद्यालयात बी.एस.सी.च्या वर्गात प्रवेश घेतला. काशी येथे शिकत असताना ते पंडित मदन मोहन मालवियांकडे श्री रामकृष्ण आश्रमात जात. प्राणीशास्त्राचे शिक्षण घेताना त्यांनी भारतीय तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, राजनीतीशास्त्र आदी विषयांचा देखील अभ्यास केला. गुरुजींचे मराठी इतकेच संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी भाषांवरही प्रभुत्व होते. १९२८ मध्ये प्राणीशास्त्र विषय घेऊन ते प्रथम श्रेणीत एम.एस.सी. झाले.


या काळात नागपूरच्या रामकृष्ण मठाचे प्रमुख स्वामी भास्करेश्वरानंद यांच्याशी गुरुजींचा संपर्क वाढला. त्यांच्याच सल्याने त्यांनी  स्वामी विवेकानंदांच्या साहित्याचा अभ्यास केला. शिक्षण संपल्यावर गुरुजींनी काशी विश्वविद्यालयात अध्यापनाची जबाबदारी स्वीकारली. भैय्याजी दाणी आणि काशी हिंदु विश्व विद्यालयातील अन्य स्वयंसेवकांमुळे गुरुजींचा संघाशी संबंध आला. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार काशी येथे आले असता गुरुजींची त्यांच्याशी भेट झाली. डॉक्टरांच्या वागण्या-बोलण्याने ते प्रभावित झाले काशी येथील संघशाखेत जाऊ लागले. अनेकदा ते संघ कामासाठी स्वयंसेवकांना घेऊन पंडित मदन मोहन मालवीय जी यांच्याकडे जात असत. संघाचे कार्य पाहून पंडितजींनी विद्यापिठाच्या परिसरात संघशाखेसाठी जागा आणि लहान खोलीही दिली.


१९३४ च्या अकोला  १९३८ च्या नागपूर मधील संघशिक्षा वर्गात गुरुजींनी प्रमुख’ म्हणून काम केले. १९३९ मध्ये त्यांची संघाचे सरकार्यवाह म्हणून नेमणूक करण्यात आले. त्याच दरम्यान  १९३५ मध्ये ते वकीलीची परीक्षाही उत्तीर्ण झाले. ऑक्टोबर १९३६ मध्ये गुरुजी कोलकात्यापासून १९० किलोमीटर लांब असलेल्या सारगाछी येथील स्वामी अखंडानंद यांच्या आश्रमात गेले. स्वामी अखंडानंदांनी गुरुजींना दीक्षा दिली, गुरुमंत्र दिला आणि समाजात जाऊन कार्य करण्यासाठी आशीर्वाद दिला. त्यानंतर गुरुजी नागपूरला परत आले. १९४० मध्ये पुन्हा त्यांना नागपूरच्या संघशिक्षा वर्गाचे प्रमुख म्हणून नेमण्यात आले. या वर्गाच्या समारोपाला डॉक्टरांनी आपले शेवटच भाषण केले. आपला उत्तराधिकारी म्हणून डॉक्टरांनी गुरुजींचे नाव जाहीर केले. २१ जून १९४० ला डॉक्टरांच्या निधनानंतर गुरुजी सरसंघचालक झाले.


३० जानेवारी १९४८ ला गांधीजींची हत्या झाली. गांधीजींच्या हत्येशी संघ किंवा गुरुजी यांचा काहीही संबंध नव्हता पण नेहरू सरकारने संघकार्य बेकायदा असल्याचे घोषित केले. गुरुजींना गांधीजींच्या हत्येचा कट करणे, सरकार उलथून टाकण्याचा प्रयत्न करणे, असे खोटे आरोप ठेवून स्थानबद्ध करण्यात आले. त्याविरुद्ध संघाने देशव्यापी सत्याग्रहाची हाक दिली. शेवटी संघावरील बंदी विनाअट उठविण्यात आली.

 
काश्मीरचे भारतात विलीनीकरण करण्यात गुरुजींची महत्त्वाची भूमिका होती. सरदार वल्लभभाई पटेलांच्या सांगण्यावरून आणि काश्मीरचे पंतप्रधान मेहरचंद महाजन यांच्या मध्यस्थीनंतर  गुरुजी काश्मीरचे महाराज हरिसिंहांना भेटण्यासाठी श्रीनगरला गेले. त्यांनी  १८ ऑक्टोबर १९४७ रोजी महाराजांची भेट घेतली. माझे राज्य पूर्णपणे पाकिस्तानवर अवलंबून आहे. काश्मीरमधून बाहेर पडणारे सर्व मार्ग रावळपिंडी आणि सियालकोटमधून जातात. माझा विमानतळ लाहोरला आहे मी भारतात आहे. मी भारतात कसा काय विलीन होवू शकतो?” अशा शब्दात काश्मीर नरेशांनी आपली हतबलता व्यक्त केली. गुरुजी त्यांना म्हणाले तुम्ही हिंदू राजे आहात. पाकिस्तानात विलीन झाल्यानंतर तुमच्या हिंदू प्रजेवर अनन्वित अत्याचार होतील व त्यांना विस्थापित व्हावे लागेल. त्यांचा विचार करणे महत्वाचे आहे. तुमचा भारताशी रेल्वे, रस्ता किंवा हवाई संपर्क नाही, हे खरे आहे, पण ते नंतरही होऊ शकते. तुमचे राज्य भारतात विलीन करणे तुमच्या आणि जम्मू काश्मीरच्या भल्याचे आहे

 

१९६२ च्या चिन विरुद्धच्या युद्धकाळात गुरुजींच्या नेतृत्वाखाली संघाने बजावलेल्या भूमिकेने तत्कालीन लष्करप्रमुख एवढे प्रभावित झाले होते की त्यांनी पंतप्रधान नेहरूंना आग्रह करून  १९६३ च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये संघाची ३००० संघ स्वयंसेवकांची एक संपूर्ण तुकडी पूर्ण गणवेशात आणि बँडसह सहभागी करुन घेतली. १९६५ च्या पाकिस्तानशी झालेल्या युद्धा दरम्यान तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी ज्या मोजक्या -राजकीय लोकांचा सल्ला घेतला होता त्यात गुरुजी हे एक होते. 

 

प्रसिद्ध पत्रकार खुशवंत सिंग यांनी गुरुजींशी झालेल्या मुलाखती दरम्यान त्यांना एक प्रश्न विचारला की तुम्ही मुस्लिमांच्या इतके विरोधात का आहात? गुरुजींनी उत्तर दिले सर्वप्रथम, मुस्लिमांनी भारतावर कधी काळी राज्य केले होते  हे विसरले पाहिजे. दुसरे, त्यांनी परकीय मुस्लिम राष्ट्रांना आपले मानणे बंद केले पाहिजे आणि तिसरे, त्यांना भारताच्या मुख्य प्रवाहात सामील झाले पाहिजे

 

इंदिरा गांधीजी कधीच गुरुजींना भेटल्या नाहीत. नेहरूंजींप्रमाणे त्यांनीही संघाला विरोध केला. पण संघाने ना त्याची पर्वा केली ना त्याला महत्त्व दिले. शेवटी संघाला टोकाचा विरोध करणाऱ्या काँग्रेस व साम्यवाद्यांच्या नाकावर टिच्चून संघाच्या दोन स्वयंसेवकांनी ३-३ वेळा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

 

आज राष्ट्रीय राजकारणात संघाचे जे महत्त्व आहे त्याचे श्रेय गुरुजींना द्यायला हवे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे संघ देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकला. स्वातंत्र प्राप्तीनंतर गुरुजींनी संघाला नवी दिशा दिली. समाजाच्या एकाच अंगाकडे न पाहता समाजातील  शिक्षण, उद्योग, शेती, धर्म  आदी सर्व क्षेत्रात काम केले पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. गुरुजींच्या प्रेरणेनेच डॉ. शामा प्रसाद मुखर्जी राजकीय क्षेत्रात काम करू लागले. ‘भारतीय जनसंघ’ या नावाने राजकीय पक्ष स्थापन करण्यात आला. विद्यार्थी परिषद, मजदूर संघ, विश्व हिंदु परिषद, वनवासी कल्याण, महारोगी सेवा, राष्ट्रीय शिशू शिक्षण आदी अनेक संस्था गुरुजींच्या प्रेरणेने सेवा करू लागल्या. डॉ. हेडगेवार यांच्या समाधी स्थानी स्मृती मंदिराची उभारणी, कन्याकुमारीचे विवेकानंद शिलास्मारक, तसेच शेकडो शिक्षण संस्था गुरुजींच्या प्रेरणेने उभ्या राहिल्या.


१९६९ पासून गुरुजींच्या प्रकृतीची अस्वस्थता वाढू लागली, तरी त्यांचा प्रवास चालूच होता. ज्येष्ठ शुद्ध पंचमी, ५ जून १९७३ या दिवशी गुरुजी अनंतात विलीन झाले. तोपर्यंत त्यांच्या नेतृत्वाखाली संघाचा भारतभर विस्तार झाला होता आणि संघ परिवाराचे जाळे समाजाच्या जवळ जवळ सर्व क्षेत्रात पसरले होते. हिंदू संघटन या धेयाप्रती वाहिलेले गुरुजींचे जिवित कार्य यशस्वी झाले होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा