राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

बुधवार, २२ जानेवारी, २०२५

 

संघ गीते

संघ शाखेवर, संघाच्या जवळजवळ सर्व उत्सवात, कार्यक्रमात, संघगीतांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. संघगीते ही प्रामुख्याने प्रकारची असतात. पहिले म्हणजे एकट्याने गायचे त्याला म्हणतात वैयक्तिक गीत व दुसरे म्हणजे एकाने गायल्यानंतर उपस्थित श्रोत्यांनी ते तसेच गायचे याला म्हणतात सांघिक गीत. वैयक्तिक व सांघिक संघगीते संघाच्या शाखात व संघाच्या कार्यक्रमात गायली जातात तर तिसरे म्हणजे संचलन गीत हे संघाच्या संचलनावेळी घोषाच्या ताला-सूरावर वाजवले जाते. वीररसाने तसेच मातृभूमीवरील निरतिशय प्रेमाने ओथंबलेली ही गीते संघ स्वयंसेवकांच्या मुखोद्गत असतात. संघाच्या परंपरेने संघगीताचा कवी कोण हे गुलदस्त्यात ठेवले जाते. साधारणपणे त्याची प्रसिद्धी केली जात नाही.

 

संघगीतांचे वैशिष्ट्य असे की संघगीतांचे विषय कालानुरूप बदलत गेले. सुरुवातीला हिंदू व हिंदुस्तान या दोन विषयांवर आधारित असलेली राष्ट्रगीते १९६२ व १९६५ च्या युद्धकाळात शौर्यगीतेवीरगीते झाली. राम जन्मभूमीच्या मुक्ती आंदोलनाच्या दरम्यान श्रीरामाची भक्तीगीते झाली तर आताच्या आधुनिक कालखंडात त्यात पर्यावरणाच्या रक्षणासंदर्भामधील विषय सुद्धा येऊन ती विज्ञानगीते झाली. संघाच्या सर्वस्पर्शी जाणीवांचे संघगीते हे काव्यमय अविष्कार आहेत.

 

अनेक संघगीते ही काव्यातील वेगवेगळ्या छंदात रचली जातात. जशी ती मुख्यतः हिंदी  व काही वेळा संस्कृत भाषेत असतात तशीच ती इतर जवळजवळ सर्व भारतीय भाषांमध्ये असतात. महाराष्ट्राचा विचार केला असता महाराष्ट्रामध्ये संघ शाखांमध्ये हिंदी तसेच मराठी संघगीते गायली जातात. संघगीतांचा हा इतिहास संघा एवढाच म्हणजे ९९ वर्ष जुना आहे. काही गीते ही प्रासंगिक असतात तर बहुतेक गीते ही कालातीत असतात. संघाची कित्येक गीते तर स्वतः सरसंघचालकांनी सुद्धा रचली आहेत. भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी बाजपेयी यांनी रचलेली कित्येक गीते संघाने संघगीते म्हणून स्वीकारली आहेत व ती संघाच्या शाखेत व कार्यक्रमात गायली जातात. परंतु असे असूनही कोणत्याही संघगीताला त्याच्या रचियत्याचे नाव दिले जात नाही.

 

संघाच्या घोषवृंदात अनेक संघ स्वयंसेवक हे संगीत क्षेत्रातील तज्ञ व संगीतात पारंगत असतात. संघगीतांना चाली लावण्याचे कामही संघ स्वयंसेवक करतात. सद्य सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत हे स्वतः उत्तम गायक असून त्यांना संगीतात उत्तम गती आहे. त्यामुळे त्यांनीही अनेक संघगीतांना चाली लावल्या आहेत. संघगीतांना चाली लावून संघगीत गाणे हा त्यांचा आवडता छंद आहे.

 

एका सुरात व एका तालात म्हटली जाणारी सांघिक गीते एकतेची भावना उत्पन्न करतात व हम सब एक है अशी जाणीव उत्पन्न करतात. संघगीते संघाच्या बैठकीत, बैठक सुरू होण्यापूर्वी तसेच मध्यंतरानंतर गाण्याची पद्धत आहे. संघगीतांमुळे उपस्थित श्रोत्यांमध्ये व्याख्यानाच्या आधी मन एकाग्र करण्यास मदत होते तसेच वीररसाने भरलेल्या संघगीतांमुळे उपस्थित श्रोत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरते.

 

मातृभूमीला तन-मन-धन अर्पण केल्यानंतरही अजूनही काहीतरी अधिक देशाला समर्पित करावे अशी भावना व्यक्त करणारे


मन समर्पित तन समर्पित

और यह जीवन समर्पित

चाहता हूँ मातृ-भू

तुझको अभी कुछ और भी दूँ 


हे गीत असो किंवा अतिप्राचीन भारताच्या इतिहासाची भव्य-दिव्य गाथा वर्णन करणारे

 

युगो युगो से दुनिया चलती,

जिसके दिव्य प्रकाश में 

पुरखों की वह पौरुष गाथा,

अजर अमर इतिहास में 


हे गीत असेल वा 


चरैवेति-चरैवेति,

यही तो मंत्र है अपना

नहीं रुकना, नहीं थकना,

सतत चलना सतत चलना


असा सातत्याने प्रयत्न करत रहा, यश नक्कीच मिळेल हा विश्वास व्यक्त करणारे हे गीत असेल वा संघाने निश्चय केलेल्या ध्येयाच्या संपूर्ण विजयाची ग्वाही देणारे


पूर्ण विजय संकल्प हमारा,

अनथक अविरत साधना


हे गीत असेल वा संघटनेवर ठाम विश्वास व्यक्त करणारे व संघटनेनेच आपण इच्छित ध्येय प्राप्त करू शकतो असा संदेश देणारे


संगठन गढ़े चलो

सुपंथ पर बढ़े चलो

भला हो जिसमें देश का

वो काम सब किए चलो


हे गीत असेल वा मातृभूमीला स्वर्गाहून पवित्र मानणारे


जननी-जन्मभूमि

स्वर्ग से महान है

इसके वास्ते ये तन है

मन है और प्राण है


हे गीत असेल वा केवळ हिंदू संस्कृती या जगाला योग्य मार्ग दाखवू शकते हे अधोरेखित करणारे


हिन्दु जगे तो विश्व जगेगा

मानव का विश्वास जगेगा


हे गीत असेल, प्रत्येक संघगीत हे देशप्रेमाने ओतप्रत भरलेले असते हे निश्चित.

 

भारतीय जनसंघाचे द्वितीय अध्यक्ष तसेच संघस्वयंसेवक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची अंत्योदय ही संकल्पनाच मुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशातील सर्वात गरीब माणसापर्यंत विकासाची गंगा पोहोचली पाहिजे. आपलं सारं काम हे अशा दिशेला पाहिजे की ज्यामुळे समाजातील सर्वात खालच्या स्तरावर असलेला माणूस, रांगेतील सर्वात शेवटचा माणूस याला सुद्धा विकासाची फळे मिळाली पाहिजेत’  या  सामाजिक नीतीवर आधारित आहे. त्यामुळेच 


चलो जलाएं दीप वहां

जहां अभी भी अंधेरा है


या गीतात अंत्योदयाची कल्पना स्पष्ट शब्दात मांडली गेली आहे.

आपल्या मातृभाषेत, मराठीत असलेल


हिंदू सारा एक मंत्र हा

दाहि दिशांना घुमवू या


तसेच


आम्ही पुत्र अमृताचे

आम्ही पुत्र या धरेचे

उजळून आज दावू

भवितव्य मातृभूचे

 

असे काळाला आव्हान देणारे गीत असो किंवा


आम्ही हिंदु ही तर आमची

स्वभाविक ललकारी रे

राष्ट्रभक्तीची विराट शक्ती

प्रकटे जागृत भारी रे

संघटनेने बळ साधावे

दारिद्रयाचे पाश तुटावे

समर्थ मंगल जीवन अमुचे

विश्वास्तव शुभकारी रे


असे संघ विचारांचे सार असलेले गीत असो वा


आम्ही बि-घडलो 

तुम्ही बिघडांना

संघाचिया संगे 

आम्ही बिघडलो

आम्ही बिघडलो 

संघरूप झालो


अशी संघमय झाल्याची जाहीर कबुली असो वा


एक हे वरदान आई

एक हे वरदान दे

संभ्रमी पार्थास या

आज आम्हा हिंदु मी

हे सांगण्या अभिमान दे

विस्मृतीने लोपलेल्या

अस्मितेला जाग दे

हिन्दु हिन्दु एक अवघा

भावना ही जागवी

देशभक्तीची चिरंतन

ज्योत हृदयी चेतवी

केशवाने दाविलेले

ध्येय अमुच्या जीवनी

पूर्ण व्हाया ते करी

या राघवाचा बाण दे


अशी मातृभूमीकडे याचना करणारे गीत असो, सारी संघ गीते एक साहित्य म्हणूनही व कविता म्हणूनही उच्च दर्जाची असतात. त्यामुळे ती गात असताना किंवा ऐकत असताना अलौकिक आनंद प्राप्त होतो. संघगीतांची हीच तर खासियत आहे.



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा