राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

बुधवार, २८ मे, २०२५

 

इदं न मम

 

भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन अशी शिकवण दिली आहे. याचा अर्थ असा की फळाची आशा न धरता काम करत जा. जे काम तू करतोस ते करणे फक्त तुझ्या हाती आहे परंतु काम केल्यानंतर फळ मिळणे मात्र तुझ्या हाती नाही’. आपण जे कार्य करीत आहोत ते कर्तव्य भावनेने करणे इष्ट आहे आणि त्यासाठी आपण कुठल्याही प्रकारे त्याचे श्रेय घेणे योग्य नाही अशी आपली संस्कृती आपल्याला शिकवते. हे माझे नाही, हे जीवन, ही क्रिया, माझे काहीही नाही, माझ्यासाठी काहीही नाही ही ती शिकवण. यामुळेच की काय भारतीय संस्कृतीत व हिंदू परंपरेत कोणतीही पूजा-अर्च्या-यज्ञ केल्यानंतर त्याचे सारे पुण्य, सारे श्रेय हे प्रत्यक्ष भगवंताला देण्याची प्रथा आणि परंपरा आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु असं म्हणून आपण उदक सोडतो. उदक सोडणे, पाणी सोडणे याचा अर्थच असा की ते कार्य, ती पूजा, तो यज्ञ भगवंताला अर्पण करणे. एखादी गोष्ट जेव्हा आपण अर्पण करतो तेव्हा त्या गोष्टीवर आपला काही अधिकार राहत नाही. आणि म्हणून हिंदू धर्मात व संस्कृतीत ब्रह्मचर्यश्रमात, गृहस्थाश्रमात, वानप्रस्थाश्रमात तसेच संन्याशाश्रमात वेगवेगळी कर्तव्य करीत असताना ती स्थितप्रज्ञ वृत्तीने पार पाडावीत असे सांगितले आहे.


माणूस तेव्हा निराश होतो जेव्हा त्याची इच्छापूर्ती होत नाही. जर एखाद्या गोष्टीबद्दल आपण आशाच धरली नसेल तर निराश होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एकदा का इच्छा किंवा आसक्तीपासून आपण दूर राहिलो तर निराशेचे ढग आपल्यावर दाटून  येणार नाहीत. एखादं कर्तव्य पार पाडत असताना आपण केवळ निमित्तमात्र आहोत व नियतीच आपल्याकडून काही ना काही प्रयोजनासाठी कार्य करून घेत आहे असे ज्यावेळी मनुष्य मानतो त्यावेळी त्याच्या मधील मी पणा संपतो, अहंभाव नष्ट होतो, अभिमान गळून पडतो व निरपेक्ष भावनेने तो कर्तव्य बजावू लागतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात व्यक्ती पूजा नाही. कोणत्याही कार्याचे श्रेय कोणालाही वैयक्तिकरित्या घेता येत नाही. जे काही कार्य तुम्हाला नेमून दिले आहे ते संघटनेच्या संपूर्ण कार्याचा एक भाग आहे. तुमचे काम  कितीही महत्त्वाचे असले तरी तुम्ही नाममात्र आहात व संघटन सर्वतोपरी आहे. त्यामुळे तुम्ही केलेले काम हे संघटनेला अर्पण करायचे आहे हा तो भाव आहे


या भावामुळे, या भावनेमुळे संघटनेच्या कार्यातील आपला सहभाग हा जरी कितीही महत्त्वाचा असला तरी मी महत्त्वाचा नाही ही भावना उत्पन्न होते. याच भावनेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गेल्या शंभर वर्षात अनेक थोर विभूतींनी आपले सारे जीवन अर्प करून संघकार्य केले आहे. यातील फक्त काही जणांचा उल्लेख इतिहासात आढळतो. असंख्यजण आपापल्या परीने, आपापल्या ठिकाणी संघकार्य करता करता अनंतात विलीन झाले पण त्यांचा उल्लेख मात्र कुठेही आढळत नाही.  याचं कारण संघ स्वयंसेवकांमध्ये असलेली इदम न मम ही भावना होय. नाही चिरा नाही पणती अशी अवस्था या असंख्य पायाच्या दगडांची आहे. परंतु त्याबद्दल कोणाही स्वयंसेवकाला यत्किंचीतही दुःख नाही. मातृभूमीला परम वैभवाकडे नेताना जो मार्ग स्वीकारावा लागतो तो काट्याकुट्यांनी भरलेला आहे हे संघकार्य सुरू करण्याआधीच सर्वांना माहीत असते. स्वातंत्रवीर सावरकरांच्या शब्दात वर्णन करायचे झाले तर असे म्हणता येईल


की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने,

लब्धप्रकाश-इतिहास-निसर्ग-माने|

जे दिव्य दाहक म्हणूनी असावयाचे,

बुद्धाची वाण धरीले करी हे सतीचे||


संघाच्या १०० वर्षाच्या इतिहासात सेवाभावी वृत्तीने काम करणारे, आपले तारुण्य एवढेच नव्हे तर आपले सारे आयुष्य संघकार्यासाठी वाहून देणारे असंख्य प्रचारक अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम करत होते व काम करीत आहेत. पूर्वोत्तर भारतात काम करत असताना साम्यवादी विचारसरणीच्या तसेच ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या हल्ल्यात कित्येक संघस्वयंसेवक बळी पडले. आजही केरळ सारख्या राज्यात जेथे ख्रिश्चन व मुस्लिम कट्टरतावाद जोपासणाऱ्या राज्यकर्त्यांचे पाठबळ असल्यामुळे, साम्यवादी विचारसरणीच्या व जिहादी विचारांच्या लोकांच्या हातून संघस्वयंसेवक बळी पडत आहे. असे असूनही संघात काम करणाऱ्या व करू इच्छिणाऱ्या तरुणांची संख्या वाढतच आहे. याला कारण आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मूलभूत तत्त्वांचे आकर्षण व आजच्या परिस्थितीतही संघाची हिंदू समाजाला असलेली गरज.


खरं पाहता जेव्हा सर्व हिंदू समाज जातीभेद विसरून एकत्र येईल व सर्व गोष्टींपेक्षा राष्ट्रहिताला प्राधान्य देईल तेव्हा संघाची गरज संपेल. तोपर्यंत संघ वाढतच राहील, विस्तारत राहील, पसरत राहील, बहरत राहील, फुलत राहील. गेली एक वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त गेल्या ९९ वर्षाच्या आणि आता खरं बघता शंभर वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. २०२४ च्या विजयादशमीला संघाच्या स्थापना दिनी, संघाला ९९ वर्षे पूर्ण झाली त्या दिवशी माझा पहिला लेख प्रसिद्ध झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त संघाने आरंभलेल्या राष्ट्रयज्ञात समिधा पडाव्यात या हेतूने  छोटासा प्रयत्न करायचे ठरवले त्याची सांगता आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जन्मदिनी होत आहे याचा  आनंद आहे. या प्रवासात मुंबई चौफेरचे संपादक मा. प्रफुल्ल फडके यांनी केलेल्या सहकार्याबद्दल व मुंबई चौफेरच्या सर्व वाचकांचा  ऋणी आहे. संघाचा भ्यासक नाही किंवा लेखक देखील नाही. लहानपणी संघाच्या शाखेवर झालेले संघसंस्कार ही आयुष्यातील मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. या देणगीची  अल्पबुद्धीने परतफेड करण्याचा प्रयत्न  केला आहे. वाचकांना तो आवडला असावा अशी आशा आहे. परंतु आकाशाचा कागद केला, साऱ्या वृक्षांची लेखणी केली व समुद्राची शाई केली तरीही गेल्या शंभर वर्षाचा संघाचा संपूर्ण इतिहास लिहिणं केवळ अशक्य आहे हे  चांगलेच माहीत आहे. म्हणून  जे काही भगव्या ध्वजाच्या कृपेने लिहिले गेले आहे ते इदं न मम.


|| इति श्रीकृष्णार्पणमस्तु ||