राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२५

 

बीज अंकुरे अंकुरे


१९२५ साली स्थापन झालेल्या संघाच्या गेल्या ९९ वर्षाच्या वाटचालीची ४ महत्वांच्या टप्प्यात विभागणी करता येईल. १९२५-१९७३ हा ४८ वर्षांचा सर्वात मोठा पहिला टप्पा म्हणजे ज्या कालखंडात संघाचे नेतृत्व डॉ. हेडगेवार व गोळवलकर गुरुजींनी केले. १९७३-१९९४ हा २१ वर्षांचा दुसरा टप्पा म्हणजे ज्या कालखंडात संघाचे नेतृत्व बाळासाहेब देवरस यांच्याकडे होते. १९९४-२००९ हा १५ वर्षांचा तिसरा टप्पा रज्जूभैय्या व सुदर्शनजी यांच्या नेतृत्वाचा कालखंड तर २००९ पासूनचा आजतागायत १५ वर्षांचा चौथा टप्पा हा मोहनरावांच्या नेतृत्वाचा वर्तमान कालखंड.


पहिला टप्प्या हा संघाच्या रुजण्याचा व संघाला ठोस संघटनात्मक स्वरूप देवून संघटन बांधणीचा उष:काल होता. या कालखंडात विदेशी तसेच स्वदेशी राज्यकर्त्यांचा विरोध असूनही हिंदू संघटन करणे व वाढवणे महत्वाचे होते.

 

१९२५ साली केवळ १७ लोकांना एकत्र करून संघाची स्थापना झाली. कोणतीही लिखित घटना वा रचना नसलेली संघटना स्थापन करण्याचा कदाचित साऱ्या जगातील हा पहिलाच प्रयोग असावा. ब्रिटिशांचे राज्य, त्यात ‘’हिंदू संघटन करणे म्हणजे ब्रिटिशांच्या पाठिंब्याने धर्मांतरण करणाऱ्या मिशनऱ्यांच्या रोषाला सामोरे जाणे होय. पैशाचा अभाव व वाहतुकीच्या साधनांची कमतरता, यामुळे या खंडप्राय देशात संघाचे जाळे पसरविणे अतिशय कठीण होते. तशातच सामाजिक जाणीव असलेल्या सर्वसामान्य भारतीय नागरिकांना स्वाभाविकपणे स्वातंत्र्याची लढाईही  हिंदू संघटन कार्यापेक्षा अधिक आकर्षित करीत होती. 


गांधी-नेहरू-बोस यांच्यासारखे लोकप्रिय नेते समोर असताना हेडगेवार वा गुरुजींसारखे त्यामानाने नवखे नेते लोकांना आकर्षित करू शकतील हे शक्य नव्हते. जातीपातीत विभागलेला हिंदू समाज एकवेळ आपल्या जातीसाठी एकत्र येईल पण हिंदू म्हणून एकत्र येणे कठीण होते. तसेच त्यावेळी राजकीय पटलावर हिंदूंना आकर्षित करू शकेल अश्या हिंदू महासभेचा देखील उदय झाला होता व राजकीय क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या हिंदूंना हिंदू महासभा ही संघाच्या मानाने अधिक सोयीची वाटत होती. एवढ्या अडचणी असूनही स्वातंत्रपूर्व काळात संघाने ही सारी आव्हाने समर्थपणे पेलली व एक स्वतंत्र सामाजिक हिंदू संघटना म्हणून आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले.



स्वातंत्र मिळाल्यानंतर लगेचच संघावर बंदी घालण्यात आली. सेक्युलर कापसाच्या जाडजूड गादीवर गाढ झोपलेल्या नेहरुजींना साम्यवादाची स्वप्ने पडत. इंग्लंड-अमेरिकेत शिकून आलेले त्यांचे उच्चभ्रू मित्र त्यांना आंतरराष्ट्रीय नेतृत्व करण्याची गळ घालत. खुशमस्कऱ्यांच्या घोळक्यात दंग असलेल्या नेहरुजींना प्राचीन भारतीय संस्कृतीपेक्षा ब्रिटिशांच्या भौतिक सुखाला चटावलेल्या चालीरीती अधिक जवळच्या वाटत. तशातच त्यांचा हिंदू-द्वेष व मुस्लिम-प्रेम सतत उफाळून येई. नेहरुजींच्या सेक्युलर व साम्यवादी विचारांच्या आड संघ एक अडसर होता. म्हणून काहीही संबंध नसताना नेहरूजींनी गांधीहत्येची संधी साधून संघावर बंदी आणली. अनेक संघस्वयंसेवकांना, अगदी गुरुजींनाही, अटक झाली. अखेर सरकारला संघबंदी बिनशर्त मागे घ्यावी लागली. 


नेहरुजी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी विशेष कायदा करून सरकारी कर्मचाऱ्यांना संघकार्यात सहभागी होण्यापासून रोखले. खरे पाहता, घटनेप्रमाणे कोणत्याही नागरिकाला संघटित होण्याचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे कोणताही सरकारी कर्मचारी कोणत्याही अराजकीय संघटनेचा सदस्य असू शकतो. राजकीय पक्ष याला अपवाद आहेत. संघ ही अराजकीय संघटना असून देखील केवळ वैयक्तिक आकसापोटी नेहरूंनी सरकारी कर्मचाऱ्यांना संघात जाण्यास बंदी घातली.

 

याच काळात देशाची फाळणी झाली. सध्याच्या पाकिस्तानात व बांगलादेशात हिंदूंवर अनन्वित अत्याचार झाले. करोडो लोक मृत्युमुखी पडले. सारे काही लुटले गेले. करोडो हिंदूंनी रिकाम्या हातांनी भारतात शरणार्थी म्हणून आसरा घेतला. अशा वेळी हिंदू विस्थापितांना मदत करून, त्यांच्या खाण्यापिण्याची, निवासाची, औषधोपचाराची व्यवस्था करण्यासाठी संघाने पुढाकार घेतला. लाखो संघस्वयंसेवक काही वर्षे याच कामात सहभागी झाले. संघाच्या पुढाकाराने भारतभर विस्थापितांच्या सुमारे ३,००० छावण्या उभारण्यात आल्या. या प्रयत्नांमुळे हिंदू विस्थापितांचे दुःख जरी कमी झाले नसले तरी त्यांच्या जखमांवर हळुवार फुंकर मारण्याचे ऐतिहासिक कार्य संघाने केले हे निश्चित.

 

संघाच्या या कालखंडातच विद्यार्थी क्षेत्रात कार्य करण्यासाठी ९४९ साली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना करण्यात आली. १९५२ साली संघाच्या पुढाकाराने गोरक्षा आंदोलन सुरू झाले. गोहत्या बंदीचा कायदा व्हावा म्हणून संघ स्वयंसेवकांनी ८५,००० गावातून जमवलेल्या पावणेदोन कोटी सह्यांचे निवेदन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना देण्यात आले. याच कालखंडात वनवासी बंधूंचा विकासासाठी तसेच त्यांचे धर्मांतर रोखण्यासाठी १९५२ साली वनवासी कल्याण आश्रमाची स्थापना करण्यात आली. त्याच वर्षी डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली हिंदू हिताची लढाई लढणाऱ्या भारतीय जनसंघ या राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली.


१९५४ साली पोर्तुगीजांच्या राजवटीखाली असलेल्या दीव-दमण मुक्ततेसाठी झालेल्या आंदोलनात तसेच १९५५ साली झालेल्या गोवा मुक्तीसंग्रामाच्या लढाईत संघ स्वयंसेवकांनी सक्रीय सहभाग घेतला. कामगार क्षेत्रात संघाने पदार्प केले ते याच कालखंडात. १९५५ साली दत्तोपंत ठेंगडी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय मजदूर संघाची स्थापना झाली. हिंदू हिताला जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त करून देण्यासाठी १९६४ साली विश्व हिंदू परिषदेची स्थापना करण्यात आली. १९७० साली एकनाथजी रानडे यांच्या संकल्पनेतून कन्याकुमारी येथे साऱ्या जगाचा दिपस्तंभ ठरेल असे स्वामी विवेकानंदांचे भव्य व जागतिक दर्जाचे शिला स्मारक उभारण्यात आले. त्याचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते करण्यात आले.

 

हिंदी-चिनी-भाई-भाई सारखी फसवी व निव्वळ बालिश घोषणा देवून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वैयक्तिक प्रतिमा उजळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या नेहरुजींना १९६२ च्या युद्धात चीनकडून पराभव पत्करावा लागला. परंतु या युद्धकाळात संघाने नागरी सेवा देण्यात पुढाकार घेतला व उत्तम सेवा बजावली. संघाच्या या कामामुळे तत्कालीन सैन्यप्रमुख एवढे प्रभावित झाले की त्यांनी नेहरूजींचे मन वळविले व संघाला प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधे संपूर्ण गणवेशात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले.


संघाने जे १९६२ च्या चीन विरुद्धच्या युद्धादरम्यान केले तेच १९६५ च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धप्रसंगी केले. फरक एवढाच की १९६२ ला संघावर डूख धरणारे नेहरूजी पंतप्रधान होते तर १९६५ ला लाल बहादूर शास्त्रीजी पंतप्रधान होते. युद्धकाळात नागरी सेवा पुरवण्याचा संघाचा चांगला अनुभव लक्षात घेता १९७१ साली बांगलादेश मुक्तीसंग्राम प्रसंगी पाकिस्तानशी झालेल्या युद्धात इंदिरा गांधींनी संघाला नागरी सेवा देण्यासाठी स्वतःहून आमंत्रण दिले.

 

राजकीय क्षेत्रातून, म्हणजेच नेहरू प्रणित काँग्रेस सरकारचा, तसेच सेक्युलर, कम्युनिस्ट, मुस्लिम संघटना व विदेशी पैशांवर पोसले जाणारे मिशनरी यांचा संघाला कडाडून विरोध असतानाही संघ या कालखंडात गुरुजींच्या नेतृत्वात दश-दिशात पसरला व फुलला. समाजाच्या सर्व क्षेत्रात संघस्वयंसेवकांनी सेवाभावी वृत्तीने काम करण्यास सुरूवात केली. विद्यार्थी, कामगार, सहकार, बँक, वनवासी आदी क्षेत्रात संघ परिवाराच्या अनेक संघटना निर्माण झाल्या. संघाचे जाळे देशभर पसरले व संघविचार मानणारे करोडो स्वयंसेवक, लाखो संघ शाखांमध्ये दररोज सहभागी होऊन नमस्ते सदा वत्सले मातृभूमे ही संघ प्रार्थना एका सुरात, एका तालात अभिमानाने गावू लागले.

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा