राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
सोमवार, २८ एप्रिल, २०२५
रामजन्मभूमी - मंदीर वही बनायेंगे
६ डिसेंबर उजाडला. ठीकठिकाणी लागलेल्या
प्रातःकालीन संघ शाखा आटोपल्या तरीही ’नमस्ते सदा वत्सले मातृभूमे’ या
संघप्रार्थनेचे पवित्र स्वर आसमंतात भरून राहिले होते. सकाळी ९ वाजता डॉ. मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी, राजमाता विजयाराजे शिंदे जानकी
महलमधून श्रीरामजन्मभूमीकडे येण्यास निघाले. आधीच ठरलेल्या आणि अतिशय
बारकाईने आखणी केल्याप्रमाणे वेगवेगळ्या
ठिकाणी लपून बसलेले कारसेवक गटागटाने बाहेर येऊ
लागले. साधारण अडीच लाख कारसेवक अयोध्येच्या रस्त्यावर उतरले होते. त्यात ५० हजार मातृशक्तीचा सहभाग होता. सव्वा १० वाजता विहिंपचे
अध्यक्ष विष्णू हरी दालमिया, महामंत्री अशोक सिंगल, स्वामी अविचलदास, साध्वी ऋतुंबरा, उमा भारती, आचार्य धर्मेंद्र, महंत
अवैद्यनाथ, संघाचे सहकार्यवाह शेषाद्री, सुदर्शनजी रामकथा कुंजाजवळ
जमले. या सर्वांनी कारसेवा अतिशय शांतीने व कोणताही अनुचित
प्रकार न घडविता करण्याबाबत मार्गदर्शन केले.
हे सारे नेते मार्गदर्शन करीत
असतानाच एकेक कारसेवक रांगेत जाऊन आपल्या जवळील वाळू नियोजित स्थानी येऊन टाकत
पुन्हा आपल्या जागी येऊन बसत होता.
सगळं काही शांतपणे चालले होते.
पावणेबाराला जिल्हा मॅजिस्ट्रेट व पोलीस अधिकाऱ्यांनी त्या परिसराचा राऊंड घेतला व
सारं काही ऑल-वेल
आहे असं त्यांनी वरिष्ठांना कळवूनही टाकलं.
परंतु इतक्यात काही जण ११ वाजून ४५ मिनिटांनी वादग्रस्त इमारतीसमोर
जोरजोराने घोषणा देऊ लागले.
यातच एका साधूने जोरदार शंखध्वनी केला व वातावरण
बदलायला सुरुवात
झाली.
त्यावेळी बारा वाजले होते. काही कळायच्या आतच सुमारे १०० हून अधिक कारसेवक आत घुसले. पोलिसांनी त्यांना
अडवण्याचा
प्रयत्न केला.
त्यांच्यावर लाठीमारही केला.
एवढे असूनही कारसेवक आत घुसत होते.
वास्तूला संरक्षित ठेवण्यासाठी भल्यामोठ्या पाईपची एकापाठोपाठ एक अशी तीन मोठी कुंपणे घालण्यात आली होती व त्यावर काटेरी तारांचे जाळे सुद्धा होते.
पण श्रीरामभक्तीने धुंद झालेले
कारसेवक कोणालाही न जुमानता या सर्व अडथळ्यांना पार करून आत घुसले. एकीकडे कोणत्याही परिस्थितीत
कारसेवकांवर गोळीबार करायचा नाही असे मुख्यमंत्र्यांचे आदेश होते तर दुसरीकडे
मनाने श्रीरामभक्त झालेल्या पोलिसांचा प्रतिकार संपुष्टात येऊ लागला होता. एका कारसेवकाने दोरी लावलेला
आकडा वर फेकला तो घुमटाच्या कळसात
अडकून बसला.
त्याचा आधार घेत तो स्वतः दोरीच्या साह्याने घुमटावर
चढला व त्यानंतर त्याच दोरीच्या साहाय्याने दहा-बारा कारसेवक घुमटावर
चढले.
कुदळी फावडी पहारी सारखी तोडकामाची
हत्यारे आधीपासून लपवून ठेवली होती.
त्याचा उपयोग करून विवादित इमारत उध्वस्त करायला सुरुवात झाली.
१५
मिनिटाच्या आतच इमारतीची पहिली भिंत
कोसळली.
एकीकडे नेतेमंडळी ‘कायदा
हातात घेऊ नका, विवादित इमारतीला धक्का लावू नका, शिस्त पाळा, आज्ञेत रहा असे आवाहन करत होते’
तर दुसरीकडे कारसेवक गेल्या पाचशे वर्षापासून लागलेल्या डागाचे नामोनिशाण
पुसून टाकायला सज्ज झाले होते. पंतप्रधानांनी स्वतः मुख्यमंत्र्यांना फोन
करून परिस्थितीची माहिती करून घेतली. परंतु निर्भीड
मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही परिस्थितीत गोळीबार करणार नाही अशी भूमिका घेतली. आपल्या अस्मितेसाठी आपलं सरकार किती महत्त्वाचा आहे हे १९९० ला असलेल्या मुलायमसिंह सरकार व १९९२ ला असलेल्या कल्याणसिंह सरकार या दोन सरकारने
घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिकेवरून कळले. बरोबर २
वाजले होते. अचानक मोठा आवाज झाला आणि आकाशात उडालेल्या
धुरळ्याच्या प्रचंड लोंढ्याबरोबरच विवादित इमारतीचा १
घुमट जमीनदोस्त झाला. ३ वाजून २५ मिनिटांनी दुसरा
घुमटही मातीत मिळाला व जो मुख्य घुमट होता तो ४
वाजून ४५ मिनिटांनी बाबरला प्यारा झाला.
सुमारे पावणे पाचशे वर्ष हिंदू समाजाला वेडावून दाखवणारी ही
वास्तू, मुस्लिम सत्ताधीशांच्या असहिष्णुतेचे प्रतीक असलेली ही
वास्तू, सहजीवनाला नाकारणाऱ्या धर्माचे प्रतीक असलेली ही वास्तू, सातत्याने लढा देऊन १९२५ साली स्थापन झालेल्या संघाच्या
प्रेरणेने स्थापन झालेल्या विहिंपने शांततामय पद्धतीने लढा देऊन व हजारो
स्वयंसेवकांचे बलिदान देऊन स्वातंत्र्यानंतरही जमीनदोस्त केली व त्यानंतर आलेल्या नरेंद्र मोदी या
संघ स्वयंसेवकाच्या
नेतृत्वाखालील सरकारने संपूर्ण वैधानिक मार्गाने न्यायालयीन लढे जिंकत भव्य अशा
श्रीराममंदिराची उभारणी केली.
अनेक शतकांच्या
संघर्षानंतर, दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्रीरामचंद्राच्या
जन्मभूमी मंदिराचे, रामलल्लाच्या मंदिराचे लोकार्पण हिंदुस्थानचे पंतप्रधान हिंदूनृसिंह नरेंद्र मोदी, परमपूज्य सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत, महंत नृत्य गोपाल दास महाराज, स्वामी गोविंद गिरी महाराज, मातृशक्तीचे प्रतीक असलेल्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल
श्रीमती आनंदीबेन पटेल, संपूर्ण साधुसंत, महंत, धर्माचार्य यांच्या रूपाने
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमूख उपस्थितीत, उद्योगपती, क्रीडापटू, पत्रकार, विद्वान, न्यायमूर्ती, संत, महात्मे, चित्रपट कलावंत व देश-विदेशातील असंख्य रामभक्त यांच्या साक्षीने झाले. करोडो करोडो लोकांनी ते
दृश्य आपल्या डोळ्यात प्राण आणून आपापल्या घरातील दूरदर्शनसंचावर पाहिले तेव्हा
त्यांच्या मनात कृत कृत्य झाल्याखेरीज दुसरा कोणताही भाव नसणार हे नक्की.
हिंदूंचा इतिहास हा विजयाचा इतिहास आहे असे सांगणाऱ्या
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘सहा सोनेरी पाने’ हा ग्रंथ लिहून भारताच्या
इतिहासातील सहा मोठ्या विजयांचे वर्णन केले आहे. पावणे पाचशे वर्षे लढला गेलेला
श्रीरामजन्मभूमी मुक्तीचा हा लढा हिंदूंनी जिंकून हिंदूंच्या इतिहासात सातवे
सोनेरी पान जोडले आहे हे निश्चित.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा