राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
सोमवार, २८ एप्रिल, २०२५
रामजन्मभूमी - मंदीर वही बनायेंगे
६ डिसेंबर उजाडला. ठीकठिकाणी लागलेल्या
प्रातःकालीन संघ शाखा आटोपल्या तरीही ’नमस्ते सदा वत्सले मातृभूमे’ या
संघप्रार्थनेचे पवित्र स्वर आसमंतात भरून राहिले होते. सकाळी ९ वाजता डॉ. मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी, राजमाता विजयाराजे शिंदे जानकी
महलमधून श्रीरामजन्मभूमीकडे येण्यास निघाले. आधीच ठरलेल्या आणि अतिशय
बारकाईने आखणी केल्याप्रमाणे वेगवेगळ्या
ठिकाणी लपून बसलेले कारसेवक गटागटाने बाहेर येऊ
लागले. साधारण अडीच लाख कारसेवक अयोध्येच्या रस्त्यावर उतरले होते. त्यात ५० हजार मातृशक्तीचा सहभाग होता. सव्वा १० वाजता विहिंपचे
अध्यक्ष विष्णू हरी दालमिया, महामंत्री अशोक सिंगल, स्वामी अविचलदास, साध्वी ऋतुंबरा, उमा भारती, आचार्य धर्मेंद्र, महंत
अवैद्यनाथ, संघाचे सहकार्यवाह शेषाद्री, सुदर्शनजी रामकथा कुंजाजवळ
जमले. या सर्वांनी कारसेवा अतिशय शांतीने व कोणताही अनुचित
प्रकार न घडविता करण्याबाबत मार्गदर्शन केले.
हे सारे नेते मार्गदर्शन करीत
असतानाच एकेक कारसेवक रांगेत जाऊन आपल्या जवळील वाळू नियोजित स्थानी येऊन टाकत
पुन्हा आपल्या जागी येऊन बसत होता.
सगळं काही शांतपणे चालले होते.
पावणेबाराला जिल्हा मॅजिस्ट्रेट व पोलीस अधिकाऱ्यांनी त्या परिसराचा राऊंड घेतला व
सारं काही ऑल-वेल
आहे असं त्यांनी वरिष्ठांना कळवूनही टाकलं.
परंतु इतक्यात काही जण ११ वाजून ४५ मिनिटांनी वादग्रस्त इमारतीसमोर
जोरजोराने घोषणा देऊ लागले.
यातच एका साधूने जोरदार शंखध्वनी केला व वातावरण
बदलायला सुरुवात
झाली.
त्यावेळी बारा वाजले होते. काही कळायच्या आतच सुमारे १०० हून अधिक कारसेवक आत घुसले. पोलिसांनी त्यांना
अडवण्याचा
प्रयत्न केला.
त्यांच्यावर लाठीमारही केला.
एवढे असूनही कारसेवक आत घुसत होते.
वास्तूला संरक्षित ठेवण्यासाठी भल्यामोठ्या पाईपची एकापाठोपाठ एक अशी तीन मोठी कुंपणे घालण्यात आली होती व त्यावर काटेरी तारांचे जाळे सुद्धा होते.
पण श्रीरामभक्तीने धुंद झालेले
कारसेवक कोणालाही न जुमानता या सर्व अडथळ्यांना पार करून आत घुसले. एकीकडे कोणत्याही परिस्थितीत
कारसेवकांवर गोळीबार करायचा नाही असे मुख्यमंत्र्यांचे आदेश होते तर दुसरीकडे
मनाने श्रीरामभक्त झालेल्या पोलिसांचा प्रतिकार संपुष्टात येऊ लागला होता. एका कारसेवकाने दोरी लावलेला
आकडा वर फेकला तो घुमटाच्या कळसात
अडकून बसला.
त्याचा आधार घेत तो स्वतः दोरीच्या साह्याने घुमटावर
चढला व त्यानंतर त्याच दोरीच्या साहाय्याने दहा-बारा कारसेवक घुमटावर
चढले.
कुदळी फावडी पहारी सारखी तोडकामाची
हत्यारे आधीपासून लपवून ठेवली होती.
त्याचा उपयोग करून विवादित इमारत उध्वस्त करायला सुरुवात झाली.
१५
मिनिटाच्या आतच इमारतीची पहिली भिंत
कोसळली.
एकीकडे नेतेमंडळी ‘कायदा
हातात घेऊ नका, विवादित इमारतीला धक्का लावू नका, शिस्त पाळा, आज्ञेत रहा असे आवाहन करत होते’
तर दुसरीकडे कारसेवक गेल्या पाचशे वर्षापासून लागलेल्या डागाचे नामोनिशाण
पुसून टाकायला सज्ज झाले होते. पंतप्रधानांनी स्वतः मुख्यमंत्र्यांना फोन
करून परिस्थितीची माहिती करून घेतली. परंतु निर्भीड
मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही परिस्थितीत गोळीबार करणार नाही अशी भूमिका घेतली. आपल्या अस्मितेसाठी आपलं सरकार किती महत्त्वाचा आहे हे १९९० ला असलेल्या मुलायमसिंह सरकार व १९९२ ला असलेल्या कल्याणसिंह सरकार या दोन सरकारने
घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिकेवरून कळले. बरोबर २
वाजले होते. अचानक मोठा आवाज झाला आणि आकाशात उडालेल्या
धुरळ्याच्या प्रचंड लोंढ्याबरोबरच विवादित इमारतीचा १
घुमट जमीनदोस्त झाला. ३ वाजून २५ मिनिटांनी दुसरा
घुमटही मातीत मिळाला व जो मुख्य घुमट होता तो ४
वाजून ४५ मिनिटांनी बाबरला प्यारा झाला.
सुमारे पावणे पाचशे वर्ष हिंदू समाजाला वेडावून दाखवणारी ही
वास्तू, मुस्लिम सत्ताधीशांच्या असहिष्णुतेचे प्रतीक असलेली ही
वास्तू, सहजीवनाला नाकारणाऱ्या धर्माचे प्रतीक असलेली ही वास्तू, सातत्याने लढा देऊन १९२५ साली स्थापन झालेल्या संघाच्या
प्रेरणेने स्थापन झालेल्या विहिंपने शांततामय पद्धतीने लढा देऊन व हजारो
स्वयंसेवकांचे बलिदान देऊन स्वातंत्र्यानंतरही जमीनदोस्त केली व त्यानंतर आलेल्या नरेंद्र मोदी या
संघ स्वयंसेवकाच्या
नेतृत्वाखालील सरकारने संपूर्ण वैधानिक मार्गाने न्यायालयीन लढे जिंकत भव्य अशा
श्रीराममंदिराची उभारणी केली.
अनेक शतकांच्या
संघर्षानंतर, दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्रीरामचंद्राच्या
जन्मभूमी मंदिराचे, रामलल्लाच्या मंदिराचे लोकार्पण हिंदुस्थानचे पंतप्रधान हिंदूनृसिंह नरेंद्र मोदी, परमपूज्य सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत, महंत नृत्य गोपाल दास महाराज, स्वामी गोविंद गिरी महाराज, मातृशक्तीचे प्रतीक असलेल्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल
श्रीमती आनंदीबेन पटेल, संपूर्ण साधुसंत, महंत, धर्माचार्य यांच्या रूपाने
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमूख उपस्थितीत, उद्योगपती, क्रीडापटू, पत्रकार, विद्वान, न्यायमूर्ती, संत, महात्मे, चित्रपट कलावंत व देश-विदेशातील असंख्य रामभक्त यांच्या साक्षीने झाले. करोडो करोडो लोकांनी ते
दृश्य आपल्या डोळ्यात प्राण आणून आपापल्या घरातील दूरदर्शनसंचावर पाहिले तेव्हा
त्यांच्या मनात कृत कृत्य झाल्याखेरीज दुसरा कोणताही भाव नसणार हे नक्की.
हिंदूंचा इतिहास हा विजयाचा इतिहास आहे असे सांगणाऱ्या
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘सहा सोनेरी पाने’ हा ग्रंथ लिहून भारताच्या
इतिहासातील सहा मोठ्या विजयांचे वर्णन केले आहे. पावणे पाचशे वर्षे लढला गेलेला
श्रीरामजन्मभूमी मुक्तीचा हा लढा हिंदूंनी जिंकून हिंदूंच्या इतिहासात सातवे
सोनेरी पान जोडले आहे हे निश्चित.
शुक्रवार, १८ एप्रिल, २०२५
रामजन्मभूमी - कारसेवकांचा महापूर
नरसिंहराव
पंतप्रधान झाल्यानंतर ते या प्रश्नी काही ठोस भूमिका घेतील अशी अपेक्षा होती पण त्यांनीही काहीच न करता ‘ठंडा करके खाओ’ ही काँग्रेसचीच भूमिका पुढे नेली. विश्व हिंदू परिषदेच्या पुढाकाराने मे १९९२ मध्ये उज्जैन येथे हिंदू धर्मगुरूंची बैठक झाली त्यात ९ जुलै पासून कारसेवा पुढे चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
खरं पाहता
श्रीरामजन्मभूमी समितीने जिथे मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला होता ती जागा विवादित
इमारतीपासून खूप लांब होती. त्यामुळे तिथे जर मंदिर उभारले गेले
असते तर विवादित इमारतीला कोणताही धोका उद्भवला नसता.
सरकारने जर थोडासाही विचार करून पुढाकार घेतला असता तर पुढे जे काही घडले ते टाळले
गेले असते. अतिशय समजूतदारपणाची
भूमिका हिंदू नेत्यांनी घेतली होती पण सुईच्या अग्रावर मावेल
एवढीही जमीन देणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या दुर्योधन-दु:शासन यांच्यात व कोणतीही तडजोड न करणाऱ्या
अहंकारी, असमंजस व जिहादी बाबरी मज्जिद संघर्ष समितीची भूमिका यात काही अंतर नव्हते.
धर्मसंसदेने
सांगितल्याप्रमाणे ९ जुलै पासून
सिंहद्वारापासून श्रीरामचबुतरा बांधण्यास सुरुवात
झाली. त्याचवेळी १५ जुलै रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने पूर्वपरवानगीखेरीज कोणतेही बांधकाम
करायला बंदी घातली. परंतु फैजाबाद प्रशासनाने
न्यायालयाच्या या आदेशाची अंमलबजावणी करण्यास असमर्थता व्यक्त केली व त्याचबरोबर
विहिंपने श्रीराम चबूतऱ्याचे बांधकाम थांबविण्यासही नकार दिला. एकीकडे पीव्ही नरसिंहराव यांनी विठ्ठलराव गाडगीळ व वसंतराव साठे या
काँग्रेसच्या नेत्यांना संघाबरोबर चर्चा करण्यास पाठवले तर २० जुलैला फैजाबादच्या जिल्हा न्यायाधीशाने उच्च न्यायालयाचे आदेश लागू
करण्यासाठी विहिंपच्या नेत्यांची चर्चा केली. अशा वेगवेगळ्या गोष्टी घडत असतानाच
फैजाबादच्या वकील संघटनांनी बांधकामाला पाठिंबा देण्यासाठी न्यायालयावर
बहिष्कार टाकून संप पुकारला.
२३ जुलैला पंतप्रधान नरसिंहराव यांनी संतमंडळाची भेट घेतली. चर्चेदरम्यान त्यांनी कबूल केले की ‘जर मंदिर पाडून मशीद बनवली आहे याचा पुरावा दिला तर जागा
हिंदूंना देण्यात येईल’ यासाठी ३ महिन्याची मुदतही देण्यात आली. त्याचबरोबर त्यांनी श्रीरामचबुतरा
येथील बांधकाम थांबवावे अशी विनंती केली. चर्चा सामंजस्याने पुढे जावी म्हणून संतमंडळींनी पंतप्रधानांची ही विनंती
मान्य केली पण त्याचबरोबर शेषावतार मंदिरासाठी असलेली कारसेवा मात्र न्यायालयाचा
कोणताही आदेश नसल्यामुळे चालूच ठेवण्यात आली.
यादरम्यान
केंद्र सरकार निव्वळ काल अपव्यय व्हावा म्हणून ज्या वेगवेगळ्या खेळी खेळत होते त्या सर्वांच्याच लक्षात येत होत्या. २७-२८ सप्टेंबरला
उत्तर प्रदेशातील नंदिग्राम येथे १२,००० श्रीराम पादुकांचे समारंभपूर्वक पूजन करण्यात आले व
ज्याप्रमाणे श्रीरामज्योत संपूर्ण देशभर फिरवून हिंदू समाजाला जागृत करण्याचे
प्रयत्न झाले त्याचप्रमाणे या १२,००० श्रीराम पादुका १९९२ च्या विजयादशमी ते दीपावली या २१ दिवसांच्या कालखंडात भारतातील लाखो गावांमध्ये समारंभपूर्वक फिरविण्यात आल्या. ३०-३१ ऑक्टोबर
रोजी नवी दिल्ली येथे साध्वी ऋतुंबरा देवी यांच्या ओजस्वी भाषणाने गाजलेली पाचवी
धर्मसंसद भरली. त्यात ६,००० संत-महंत उपस्थित होते. या धर्मसंसदेत अनेक ठराव संमत
करण्यात आले व त्यात ६ डिसेंबर पासून अयोध्येत पुन्हा कारसेवा सुरू करण्यासंबंधीचा महत्त्वाचा ठराव
पारित करण्यात आला.
या
ठरावानंतर संघ, विहिंप, बजरंग दल,
दुर्गा वाहिनी, राष्ट्र सेविका समिती सहित भाजप व असंख्य
हिंदू संघटना, संस्था यांनी ६ डिसेंबरच्या कारसेवेच्या तयारीला आरंभ केला. धर्मसंसदेच्या या ठरावानंतर लगेचच विहिंपतर्फे ज्या दिवशी २ वर्षांपूर्वी कोठारी बंधूसहित शंभरहून अधिक कारसेवकांना मुलायमसिंह सरकारने
क्रूरपणे ठार केले होते त्यांच्या स्मृतीला आदरांजली वाहण्यासाठी ३० ऑक्टोबर हा दिवस हुतात्मा दिवस म्हणून
पाळण्यात आला.
नोव्हेंबर
महिना सुरू होताच उत्साही कारसेवकांचे लोंढेच्या
लोंढे अयोध्येच्या दिशेने येऊ लागले. विहिंपच्या वतीने सर्व कारसेवकांची व्यवस्थित नोंदणी करण्यात येत होती व
त्यांना योग्य त्या सूचना व मार्गदर्शनही करण्यात येत होते.
जसजसा ६ डिसेंबर हा
दिवस जवळ येत होता तसतसे वातावरण तापत गेले. लालकृष्ण अडवाणींनी प्रतीकात्मक कारसेवा करावी अशी सूचना दिली तर संघाचे सरकार्यवाह रज्जूभैयांनी
कारसेवा म्हणजे भजन कीर्तन पूजा अर्चा व्हावी व २.७७ एकरांवरच कारसेवा करावी असे
मत व्यक्त केले. कारसेवा होण्याच्या प्रत्यक्ष आठवडाभर आधीच भाजपा, संघ, विहिंप व
साधुसंतांची धर्मपरिषद यांच्यात वेगवेगळे विचारप्रवाह होते.
यादरम्यान लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या ही त्यांची अपूर्ण राहिलेली यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय
घेतला व त्याप्रमाणे ही यात्रा १ डिसेंबरला वाराणसीपासून पुन्हा सुरू करून ती अयोध्येकडे यायला निघाली.
यावेळी या कारसेवेला प्रतिबंध करण्यासाठी विरोधी पक्षांनी देखील प्रचंड
प्रयत्न केले. केंद्र सरकारने तर कोणतेच प्रयत्न करण्याचे शिल्लक ठेवले
नव्हते. पुन्हा ३० ऑक्टोबर
सारखी घटना घडू नये म्हणून बजरंग दलाचे फायर ब्रँड नेते विनय कटियार यांनी स्पष्ट शब्दात सरकारला सुनावले की ‘कारसेवक हे संपूर्ण शांततामय रीतीने कारसेवा करू इच्छितात. जर बळाचा वापर झाला तर ते काही करू शकतात. त्यांच्यावर एका मर्यादेपर्यंतच बंधने घालता येतील.
कारसेवा जर जबरदस्तीने थांबवण्याचा प्रयत्न केला तर काहीही घडू शकते’
एवढे
होईस्तो देशाच्या विविध प्रांतातून ८० हजार कारसेवक अयोध्येत आधीच दाखल झाले होते. प्रचंड थंडी, त्यामुळे त्यांच्या राहण्याची, जेवणाची, औषधोपचाराची सर्व व्यवस्था करण्यात संघ व
विहिंपचे असंख्य कार्यकर्ते गुंतून गेले होते. संघाचे सहकार्यवाह हो. वे. शेषाद्री यांनी कारसेवा कशाप्रकारे करावी हे
अतिशय स्पष्टपणे सांगितले होते. ते म्हणाले की ‘ही कारसेवा म्हणजे मंदिर निर्माणाची पूर्व तयारी असेल, जी सरकारने ताब्यात घेतलेल्या २.७७ एकर मध्येच होईल. त्यात साफ-सफाई, सपाटीकरण आदी कामांबरोबर भजन कीर्तन अशी धार्मिक कामेच होतील’.
४ डिसेंबरला अयोध्येमध्ये कारसेवकांची गर्दी एवढी वाढली की त्यांची सोय करणेच अशक्य होऊन बसलं. त्यामुळे भारतातून अयोध्येकडे येणाऱ्या अनेकांना परत जाण्याचे आदेश देण्यात आले व आणखी कारसेवक पाठवू नका असे आवाहन करण्यात आले. या दरम्यान एक
चांगली घटना घडली. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका
आदेशानुसार ज्या न्यायमूर्ती तेजशंकर यांची अयोध्येतील ‘कारसेवेचे
निरीक्षक’ म्हणून नियुक्ती झाली होती त्यांच्या अहवालाचा आधार घेत सर्वोच्च न्यायालयाने ४ डिसेंबरला वादग्रस्त जागेवर कोर्ट रिसिव्हर नेमावा अशी विनंती करणाऱ्या
अर्जावरील सुनावणी बेमुदत तहकूब केली.
गुरुवार, १७ एप्रिल, २०२५
रामजन्मभूमी – शिलान्यास
२९ तारखेला महंत
नृत्यगोपाल दासांना अटक करण्यासाठी पोलीस आले. महंतानी त्यांना विनंती केली की ‘आज कशाला अटक करता. उदया शिलान्यासाला मी ज्यावेळी
निघेन त्यावेळी तुम्ही मला अटक करा.’ पण पोलीस ऐकायला तयार
नव्हते. अशावेळी असंख्य कारसेवक जमा झाले व ते मुलायम सरकार
विरोधात जोरदार घोषणाबाजी करू लागले. गोंधळ एवढा वाढला की
पोलिसांनाही काय करावे ते कळत नव्हते. अशावेळी छत्रपती
शिवाजी महाराजांना आपले दैवत मानणाऱ्या महंत नृत्यगोपाल दासांनी ज्याप्रमाणे
छत्रपतींनी आग्र्याहून आपली सुटका करून घेतली तशीच या गोंधळाचा फायदा घेत त्यांनी
पोलिसांच्या बंदोबस्तातून
नाट्यमय रीतीने आपली सुटका करून घेतली. तिथून ते जे निसटले ते शिलान्यासाच्या
दिवशी ३० तारखेलाच प्रकटले.
एवढा प्रचंड बंदोबस्त असताना आणि एकही कारसेवक अयोध्येत
प्रवेश करू शकतच नाही याची खात्री असताना ३० ऑक्टोबरला कारसेवा होणारच नाही
याच्याबद्दल कारसेवक सोडून सर्वांनाच
खात्री होती. त्या दिवशी
सकाळी सगळीकडे शांतता होती. ९ वाजून ४४ मिनिटांनी कारसेवेचा मुहूर्त
होता अशा वेळी ९ वाजून १० मिनिटे झाली आणि मणीराम
छावणीचा दरवाजा उघडून विहिंपचे सरचिटणीस अशोक सिंहल आपल्या
सोबत चार-पाच कारसेवक घेऊन
बाहेर पडले. तेथून ते
समोरच्या वाल्मिकी रामायण भावनात गेले. नंतर पाचच मिनिटांनी
महंत नृत्यगोपाल दास, स्वामी वामदेव,
विवेकानंदजी महाराज, साक्षीजी महाराज आदी संत वाल्मिकी
रामायण भावनात आले, त्यांच्या मागे हजारो कारसेवक होते.
साधुसंतांना व अशोक सिंहलना रस्त्यावर पाहताच गल्लीबोळातून
कारसेवक प्रगट होऊ लागले. कालपर्यंत कुठेच दिसत नसलेले हे कारसेवक कुठे लपून बसले
होते याची कुणालाच कल्पना नव्हती. बघता बघता कारसेवकांची संख्या लाखांवर गेली. ते पाहून पोलिसांचा स्वतःवरच विश्वास बसत नव्हता.
कोणीही लाठीमाराला दाद देत नव्हते. कारसेवा थांबवा व
कारसेवकांना मागे घ्या अशी विनंती पोलीस अधिकाऱ्यांनी महंत नृत्यगोपाल दास यांना
केली. या दरम्यान एक नाट्यमय घटना घडली. हनुमान गढीजवळ उभ्या असलेल्या राखीव पोलिसांच्या एका बसचा ताबा धरमदास
पहिलवान नावाच्या एका साधूने घेतला. अनेक कारसेवकांना घेऊन
ती बस पोलिसांनी रचलेले अडथळे तोडत भरधाव निघाली. त्यामुळे सर्व रस्ता साफ झाला. जन्मभूमीचा परिसर कारसेवकांनी भरून गेला.
काय होतंय ते कुणालाच कळत नव्हतं. यानंतर काही क्षणातच कित्येक कारसेवक त्या जीर्ण इमारतीवर
चढले व त्यांनी तिथे भगवा ध्वज फडकवला. हे पाहताच गहिवरून
आलेले कित्येक पोलीस आपली ड्युटी विसरून कारसेवेत
सहभागी झाले. डीआयजी गिरीधर शर्मा यांचीही आज्ञा कोणी पाळेनासे झाले. जिल्हा पोलीस
अधीक्षक सुभाष जोशी चार-पाच पोलिसांना कसेबसे घेऊन आले. त्यांनी घुमटावर चढलेल्या काही कारसेवकांचा
गोळ्या झाडून खून केला. पण त्याने कोणीही डगमगले नाही. हनुमानगढी जवळ अशोक सिंहल पोलीस हल्ल्यात
जखमी झाले. त्यांचे डोके
फुटले. भळाभळा रक्त वाहू लागले.
त्यामुळे त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. या
कारसेवेच्या प्रसंगात बारा कारसेवक हुतात्मा झाले. ‘खून देंगे, प्राणही देंगे, लेकीन मंदिर वही
बनायेंगे’ ही घोषणा
कारसेवकांनी सत्यात उतरवून दाखवली.
३० ऑक्टोबरला मिळालेल्या या
पहिल्या विजयानंतर कारसेवकांमध्ये अमाप उत्साह संचारला. ३१ ऑक्टोबर हा विश्रांतीचा दिवस
होता. १ नोव्हेंबरला संध्याकाळी ५०,००० कारसेवकांपुढे
अशोक सिंहल यांचे भाषण झाले. त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता रामलल्लाच्या दर्शनासाठी दोन्ही हात वर
करून रामनामाचे भजन करत जायचे आहे असा संदेश दिला. त्याप्रमाणे दोन नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता मणीराम दास छावणी बाहेर
सुमारे ५०,००० कारसेवक तयार होते. परंतु कारसेवकांना कोणत्याही परिस्थितीत
रोखायचे असा चंगच मुलायमसिंगांनी बांधला होता. त्यामुळे जनरल डायरला सुद्धा लाजवेल अशा
अमानुष रीतीने मुलायमसिंहांनी पोलिसांना त्यांच्यावर प्रसंगी गोळीबार करा पण
त्यांना पांगवा असा आदेश दिला. कोणतीही पूर्वसूचना न देता कारसेवकांवर आधी अश्रुधुराचा मारा करण्यात
आला व त्यानंतर चहूबाजूंनी पोलिसांनी गोळीबार सुरू केला.
यावेळी दुकानात शिरलेल्या एका कारसेवकाला चक्क खेचून बाहेर
काढण्यात आले व त्याच्या
डोक्यात पॉईंट ब्लॅक गोळी झाडून ठार करण्यात आले. त्याला वाचवायला आलेल्या त्याच्या भावालाही
पोलिसांनी निर्दयतेने ठार मारले. रामकुमार आणि शरद हे दोन
कोठारी बंधू जय श्रीराम म्हणत हुतात्मा झाले. त्यांच्या आत्म्याची अमर ज्योत अखंडपणे या
देशाला बलिदानाची व समर्पणाची आठवण देत राहील. पुढे दोनच महिन्यांनी ज्यावेळी अशोक
सिंहल त्यांच्या मात्यापित्यांचे सांत्वन करण्याकरता कलकत्ता येथे पोहोचले तेव्हा
वीरगतीला प्राप्त झालेल्या कोठारी बंधूंच्या आई-वडिलांनी न खचता पुढील कारसेवेत
स्वतः सहभागी होण्याचा निर्णय अशोक सिंहल यांना बोलून
दाखवला. यावरून कारसेवेचा पगडा
सर्वसामान्य माणसांत किती होता हे लक्षात येते. पोलिसांच्या या गोळीबारात शेकडो कारसेवक
हुतात्मे झाले. ते जिवंत आहेत की नाहीत याची शहानिशा
न करता पोलिसांनी त्यांना शरयू नदीत फेकून दिले. शरयू नदी रक्ताने लाल झाली. याआधी श्रीरामजन्मभूमी
मुक्तीसाठी हिंदूंनी ७६ युद्ध केली पण ही सारी युद्धे
मुघलांविरुद्ध होती. परंतु हे युद्ध सर्वस्वी वेगळे होते. निशस्त्र
रामसेवकांनी केलेल्या सत्याग्रहाला चिरडून टाकण्यासाठी आपलेच हिंदू बांधव त्यांना
ठार मारत होते. पोलिसांच्या व मुलायमसिंहच्या या
अत्याचारांची काळीकुट्ट नोंद पुढील हजारो वर्षे इतिहास पुढील हजारो वर्षे ठेवेल हे
निश्चित.
१० नोव्हेंबर १९९० ला चंद्रशेखर पंतप्रधान झाले व
त्यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. चंद्रशेखर काही वेगळ्या निर्णय घेतील या
भीतीपोटी केवळ ४० दिवसातच काँग्रेसने त्यांचा पाठिंबा काढून घेतला.
एकीकडे पुराव्यांची लढाई चालू असतानाच श्रीरामजन्मभूमीसाठी ६ डिसेंबर १९९० ला सुरू झालेला सत्याग्रह १४ जानेवारी १९९१ ला संपला. या ४० दिवसात ३ लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी
सहभाग घेतला. यात ३५ हजाराहून अधिक महिला होत्या. १९९१ च्या वर्ष प्रतिपदेला घराघरावर
भगवे ध्वज फडकवण्याचा व २४ मार्चच्या श्रीरामनवमीला ठीकठिकाणी श्रीरामाच्या मिरवणुका
काढण्याचाही निर्णय घेण्यात आला. मुलायम सरकारने या मिरवणुकांवरही बंदी आणण्याचा
निर्णय घेतला. परंतु या
घटनाबाह्य आदेशाला धुडकावून मिरवणुका घेण्यात येतील व आंदोलन करण्यात येईल असा
इशारा विहिंपचे महामंत्री अशोक सिंहल यांनी दिला. त्यामुळे घाबरलेल्या मुलायम सरकारने हे
आदेश मागे घेतले. नुसत्याच उत्तर प्रदेशातच नव्हे तर अशा
प्रकारचे आदेश देशाच्या अनेक ठिकाणी पोलिसांनी दिले होते. परंतु जसजसा हिंदू संघटित होत होता ते
पाहून पोलिसांना असे असंविधानिक आदेश मागे घेण्यापासून पर्याय उरत नव्हता.
२-३ एप्रिल १९९१ ला विहिंपने दिल्ली येथील
तालकटोरा स्टेडियमवर चौथ्या धर्मसंसदेचे आयोजन केले. यात ६ हजाराहून अधिक धर्माचार्य व
साधुसंत एकत्र आले होते. ४ प्रमुख पीठांचे शंकराचार्यही मंचावर उपस्थित होते. ४ एप्रिलला बोट क्लबवर अतिविशाल
महामेळावा संपन्न झाला. ज्यात २५ लाख लोक उपस्थित होते. या महामेळाव्यात अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी सहित संघाच्या
नेत्यांची भाषणे झाली. दिवस निवडणुकांचे होते. निवडणूक प्रचारा दरम्यान दुर्दैवाने राजीव गांधी
यांची हत्या झाली व त्या सहानुभूतीचा फायदा मिळवून अल्प मतातील पीव्ही नरसिंहराव
यांचे सरकार दिल्लीत तर मुलायमसिंह यादव यांचा धुव्वा उडवत भाजपच्या कल्याण सिंहाचे
सरकार उत्तर प्रदेशमध्ये आले. त्यानंतर ताबडतोब चक्रे फिरली व १० ऑक्टोबरला कल्याणसिंह सरकारने श्रीरामजन्मभूमी
जवळील २.७७ एकर जमीन
सरकारच्या ताब्यात घेतली. याचा फायदा असा झाला की यामुळे
विवादित वास्तूचा व मंदिर मंदिराच्या
बांधकामाचा परस्परांशी
असलेला संबंध तुटला.
गुरुवार, १० एप्रिल, २०२५
रामजन्मभूमी - सरकारचे चक्रव्यूह
परकीय
आक्रमक मोहम्मद घोरीने १६ वेळा
पाडलेल्या सोमनाथ मंदिराच्या उभारणीसाठी पुढाकार घेतलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य छायाचित्र असलेल्या व्यासपीठावरून लालकृष्ण आडवाणी यांची सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा प्रारंभ झाली. धर्मांध अतिरेक्यांनी उर्ध्वस्त केलेल्या सोमनाथाची प्राणप्रतिष्ठा करून
ज्याप्रमाणे सरदार पटेलांनी राष्ट्राभिमान जागवला तसाच राष्ट्राभिमान जागवण्यासाठी, अयोध्येला भव्य श्रीराममंदिराची उभारणी करण्याचा निर्धार लालकृष्ण अडवाणी यांनी बोलून दाखवला. या यात्रेचा उद्देश संपूर्ण भारतभर हिंदूमत जागृत करणे हा तर होताच पण जे-जे लोक श्रीराममंदिर
उभारणीस विरोध करत आहेत त्यांचे मतपरिवर्तन करणे व देशभर जागृत झालेल्या
हिंदूशक्तीचा त्यांना परिचय करून देणे हाही होता. साधारणपणे १०,००० किलोमीटरचा
प्रवास करून देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये हिंदू जागृतीचे काम करणे हे अतिशय
महत्त्वाचे आणि ऐतिहासिक कार्य लालकृष्ण अडवाणी यांनी केले त्याबद्दल हिंदू समाज
त्यांचा कायमचा ऋणी राहील. प्रत्येक ठिकाणी या रथयात्रेचे
देवदुर्लभ स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी प्रचंड मोठ्या सभा घेण्यात आल्या. श्रीरामजन्मभूमी
मंदिराच्या बांधणीच्या अनुकूल जनमत तयार झाले. संपूर्ण देश श्रीराममय झाला.
या दरम्यान
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांची प्रक्षोभक भाषणे चालू होती. त्यांच्या भाषणांमुळे उत्तर प्रदेशात जातीय दंगली उसळत होत्या. जामा मशिदीच्या
शाही इमामांनी सरकारला
रथयात्रा रोखण्यासाठी १२ ऑक्टोबर १९९० ही मुदत दिली होती. आणि जर तसे झाले नाही तर मुस्लिम
समाज स्वतःच रथयात्रा रोखेल अशी धमकीही दिली होती. १९ ऑक्टोबरला राष्ट्रपतींनी रामजन्मभूमी संबंधी एक अध्यादेश काढून सर्व जागा
सरकारच्या ताब्यात घेतली. मुस्लिमांची इकोसिस्टीम केवढी तगडी
असते ती पहा. निधर्मवादी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सुद्धा मुस्लिमांची बाजू घेत धमकीचा
सूर आळवला व धर्मांध मुस्लिम नेत्यांनी या अध्यादेशाला विरोध करत व्हीपी
सिंग यांचे सरकार धुळीस मिळवू अशी गंभीर धमकी दिली. त्यामुळे व्हीपी सिंह सरकारने केवळ दोनच दिवसात इमाम बुखारींसारख्या
धर्मांध नेत्याच्या आग्रहावरून २१ ऑक्टोबरला
हा अध्यादेश मागे घेतला.
त्यानंतर
मात्र केंद्र व राज्य सरकारने एकत्रितरित्या दमनचक्र सुरू केले. मुलायम सिंहांने कल्याणसिंहांना पुन्हा एकदा
रासुका खाली अटक केली. सर्वपक्षीय जनमत तयार करावे यासाठी केंद्र सरकारने पश्चिम
बंगालचे ज्योती बसू,
ओरिसाचे
बिजू पटनायक, महाराष्ट्राचे
शरद पवार, आंध्रचे एम सी रेड्डी, गुजरातचे चिमणभाई पटेल व उत्तर प्रदेशचे
मुलायमसिंह या
६ मुख्यमंत्र्यांची
एक समिती बनवली.
२२ ऑक्टोबरला या ६ मुख्यमंत्र्यांची दिल्लीमध्ये एक बैठक झाली त्यात
मुलायमसिंह यांनी
३० ऑक्टोबरला श्रीराम जन्मभूमीवर श्रीराम
मंदिराची उभारणी करू पाहणाऱ्या कारसेवकांवर गोळीबार करण्याची परवानगी मागितली. मात्र समितीने ती स्पष्ट शब्दात फेटाळून लावली.
त्याच दिवशी योगायोगाने अखिल भारतीय मुस्लिम समितीची
लालकृष्ण आडवाणी यांची रथयात्रा त्वरित रोखावी यासाठी सुप्रीम कोर्टात केलेली याचिका
फेटाळून लावण्यात आली. अडवाणींच्या या रथयात्रेने देशात हिंदूंच्या भावना इतक्या टोकाला गेल्या
होत्या की धनबाद येथे बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी लालकृष्ण अडवाणी यांना अटक करण्याचा
आदेश दिल्यानंतर पोलीस
उपायुक्त
अमानुल्ला व पोलीस निरीक्षक रणधीर शर्मा यांनी केवळ तोंडी आदेशावर अटक करण्यास नकार दिला
व मुख्यमंत्र्यांना लेखी आदेश देण्याची विनंती केली.
अडवाणींना
अटक करण्याचा पहिला
प्रयत्न
निष्फळ ठरल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव अधिक सावध झाले व त्यांनी बिहारचे पोलीस
महासंचालक आर.आर. प्रसाद यांना अडवाणींना अटक करण्याची योजना
गुप्तपणे पार पाडण्यास सांगितले.
२२ ऑक्टोबरला
अडवाणी पाटण्याहून
समस्तीपुरकडे
निघाले. समस्तीपुरच्या
पटेल मैदानावर संध्याकाळी आडवाणींची सभा होती. त्याआधीच समस्तीपुरचा साऱ्या भारताशी संबंध तोडण्यात आला. प्रसादांच्या आज्ञेवरून पोलीस उपमहासंचालक रामेश्वर ओरोन संध्याकाळी सहा वाजताच अडवाणी होते तेथे पोहोचले. अटक होणार हे अपेक्षितच होते. त्यामुळे त्यांनी ओरोन यांना काही वेळ
थांबवले. आपल्या टेबलापाशी येऊन
त्यांनी राष्ट्रपतींना
‘व्हीपी सिंग यांच्या
केंद्र सरकारचा भाजपा पाठिंबा काढून घेत आहे’ असे पत्र लिहिले.
भाजपाने व्हीपी सिंग यांच्या सरकारचा पाठिंबा काढून
घेतल्यामुळे ते सरकार कोसळले.
त्यानंतर
चंद्रशेखर हे
४० खासदार असलेल्या पक्षाचे नेते या देशाचे पंतप्रधान झाले. त्यांना काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिला. नेहमीप्रमाणेच काँग्रेसने हा पाठिंबा केवळ ४० दिवसातच
काढून घेतला व देशाला मध्यावधी निवडणुकांना सामोरे जावे लागले. अडवाणींना अटक करण्याबरोबरच मुलायमसिंहांनी संघाचे सरकार्यवाह रज्जूभैया तसेच विहिंपचे अध्यक्ष विष्णू
हरी दालमिया, राजमाता विजयाराजे शिंदे,
गुमानमल
लोढा, महंत अवैद्यनाथ, स्वामी चिन्मयानंद इत्यादी आंदोलकांनाही विविध ठिकाणांहून अटक केली. या अटकेच्या विरोधात २४ ऑक्टोबरला भारत बंदची हाक
देण्यात आली. हा बंद
प्रचंड यशस्वी ठरला.
दरम्यानच्या काळात मुलायमसिंग यांनी दमनचक्र चालविले व श्रीरामभक्तांना अटक करण्यास सुरुवात केली. लाखो श्रीरामभक्त तुरुंगात गेल्यामुळे तुरुंग अपुरे
पडायला लागले. त्यामुळे
त्यांना शाळा महाविद्यालय आदी ठिकाणी ठेवण्यात आले. या कारसेवकांच्या प्राथमिक गरजांची पूर्तता सुद्धा सरकारने केली नाही. त्यांना साध्या अन्न-पाण्यापासून सुद्धा वंचित ठेवण्यात आले. अशावेळी गावकरी त्यांना अन्न
उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत होते. ते अन्नही मुलायमसिंगांचे पोलीस कारसेवकांपर्यंत पोहोचू देत
नव्हते. सीतापुर व उंनावमध्ये तर
कारागृहामध्ये
बंद
असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कैद्यांना ‘कारसेवकांना मारहाण करावी’ असे आदेश देण्यात आले. यात उंनावमध्येच ६
कारसेवकांची
जेलमध्ये
हत्या करण्यात आली.
१९ ऑक्टोबरला मुलायमसिंग यांनी अयोध्येस भेट दिली व शिलान्यासाच्या ठिकाणी असलेला पत्र्याचा
मंडप तोडून टाकला. शिलान्यास स्थानी असलेली श्रीरामाची मूर्ती हटवली व शिलान्यासाचा
खड्डा बुजवण्याचा प्रयत्न केला.
२७ ऑक्टोबरला ‘अयोध्या मे परिंदा भी पर नही मार सकता’ अशी गर्जना करणाऱ्या मुख्यमंत्री मुलायमसिंह यांच्या
नाकावर टिच्चून अखिल भारतीय कारसेवा समितीचे अध्यक्ष वासुदेवानंद सरस्वती
यांच्या नेतृत्वाखाली
१,००,००० कारसेवकांचा विराट मोर्चा
प्रयागवरून पायी अयोध्येकडे निघाला. अतिशय शांततेने चालू असलेल्या या मोर्चावर पोलिसांनी
अंधारात लाठीमार,
गोळीबार
केला. महिलांनाही झोडपून
काढले व
बाकीच्यांना पांगवले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)